ETV Bharat / state

'शासन आपल्या दारी' या अभियानाच्या माध्यमातून 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 10:09 PM IST

Shasan Aplya Dari
शासन आपल्या दारी

Shasan Aplya Dari : बीड जिल्ह्यातील परळी येथे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार पंकजा मुंडे असे नेते उपस्थित होते.

बीड Shasan Aplya Dari : आम्ही आधी करतो आणि मग बोलतो, आम्ही घरात बसून राहात नाही तर शासन म्हणून सर्वांना बरोबर घेऊन आपल्या दारी येतो. त्यामुळं आज बीडच्या कार्यक्रमापर्यंत 'शासन आपल्या दारी' या अभियानाच्या माध्यमातून 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला आहे. हेच या योजनेचं ठळक यश असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज केलं. परळी येथील ओपळे मैदानावर 'शासन आपल्या दारी' अंतर्गत विविध योजनांचे लाभ आणि जिल्ह्यातील प्रस्तावित येाजनांचे भूमिपूजन तसंच लोकार्पण पार पडलं. त्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

892 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन : राज्यातील 20 जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम झाला. त्यातील गर्दीचे सारे उच्चांक या कार्यक्रमाने मोडले. याबद्दल धनंजय मुंडे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना 749 कोटी रुपयांच्या विविध योजनांचे वाटप करण्यात आले. तर प्रस्तावित इमारत आणि वस्तीगृह, तीर्थश्रेत्र परळी विकास अंतर्गत असलेल्या विविध 892 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.


अधिक मदत आणि निधी देण्याचा प्रयत्न : यातील परळी येथील तीर्थश्रेत्र विकास आराखडा महत्वाचा आहे. यासाठी शासनाने 286.68 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी प्रदान केली आहे. याखेरीज जिल्ह्यातील नवे जिल्हाधिकारी, प्रशासकीय, कृषी कार्यालय, सिरसाळा एमआयडीसी आदीसह भगवानबाबा विद्यार्थी वस्तिगृह इमारत यांचा यात समावेश आहे. नागरी सुवर्णोत्थान कार्यक्रमासाठी 141 कोटी रुपयांची मंजूरी देण्यात आली आहे. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यात पुरवणी मागणीत अधिक मदत आणि निधी देण्याचा प्रयत्न शासन करणार आहे. कृषिमंत्री झाल्यानंतर 100 दिवसात शेतकरी लाभाचे 75 निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतले.



बीडच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. एकही दिवस त्यांनी सुटी घेतली नाही. शासन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करत आहे. नुकसान भरपाईत वाढ केली असून, एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही तातडीने देण्यात आले आहेत. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी शासन बचतगटाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. बीडच्या औद्योगिक विकासाला चालना देणार असून यातून येथील लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. बीडच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य राहील. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला हक्काचे आणि टिकणारे आरक्षण देणार असल्याचेही ते म्हणाले.



महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणार : शेतकऱ्यांना दिवसा सलग 12 तास विद्युत पुरवठा उपलब्ध झाल्यास शेतकरी समृद्ध होणार आहे. ही जाणीव ठेवून प्रत्येक शेतकऱ्याला सौर उर्जा उपलब्ध करुन पूर्ण वर्षभर दिवसाला 12 तास वीज मिळावी असं नियोजन असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी सांगितलं. दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांसोबत शासन आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी समृद्धी योजना टप्पा 2 मधून आगामी काळात शेतकऱ्यांना स्थैर्य प्राप्त होईल, यासाठी प्रयत्नशील आहे. 11 हजार 400 कोटी खर्चून कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेतून कामे होत आहेत. मराठवाडा ग्रीडचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. जलयुक्त शिवार टप्पा 2 मध्ये बीड जिल्हा अग्रेसर राहील. बीडच्या आठही साठवण तलावांना मान्यता दिल्याचं फडणवीस म्हणाले. मुंडे यांनी केलेल्या वैजनाथ तीर्थश्रेत्र योजनेच्या मागणीच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणार असल्याचेही फडणवीस म्हणाले. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे भाऊ बहिण एक आहेत. त्यांच्यामध्ये काही दुही नाही. त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देणारं वक्तव्यही यावेळी फडणवीस यांनी केलं.



केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधाला विरोध करण्यात अर्थ नसून विकास कामांसाठी एकत्रित येण्याची गरज आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देशाला 5 ट्रिलियनचे उद्दीष्ट गाठायचे आहे. त्यात राज्याचा वाटा 1 ट्रिलियन असावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अनेक महत्वाची विकासकामे सुरू आहेत. कामे गतीने पूर्ण झाली आहेत. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. कृषी विभागाने मागील काही महिन्यात 75 शासन निर्णय घेतले आहेत. पीक विमा योजनेत 48 लाखाहून अधिक अर्ज विम्यासाठी पात्र आहेत. कोट्यवधी रुपयांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


बीड जिल्ह्याचा मागासलेपण दूर करून जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करू : पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) लोकप्रतिनिधी आणि जनतेचा प्रतिसाद पाहून माझीच नजर ना लागो माझ्या वैभवाला असे म्हणाले, मुख्यमंत्री खरंच एकनाथ आहेत, त्यांच्यामुळे एकी निर्माण झाली, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांचं कौतुक केलं. शासन आपल्या दारी उपक्रमातून 36 हजार लाभार्थ्यांना लाभ झाला, याचा आनंद झाला आहे. जिल्ह्यात 1400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केल्याबद्दल शासनाचे आभारही मुंडे यांनी मानले. बीड जिल्ह्याचे मागासलेपण दूर होऊन आगामी काळात सर्वात जास्त विकसित जिल्हा म्हणून लौकिक राहील, यासाठी प्राधान्याने काम करु. जिल्ह्यात विकासाची गंगा आणू, सर्वजण मिळून जिल्ह्याचा विकास करू, असेही मुंडे म्हणाले.


औद्योगिक विकासाला अधिक चालना द्यावी : महिलांसाठी 8 निवासी शाळा, कृषी महाविद्यालय, अंबाजोगाईत देवणी गोवंश केंद्र आदी विकासकामे शासनाने केली आहेत. देशात उज्जैन, काशी विश्वेश्वर या धर्तीवर परळी वैजनाथ येथे प्रसाद योजनेंतर्गत प्रस्ताव राज्याने केंद्राला पाठवावा. त्याचबरोबर परळीच्या औद्योगिक विकासाला अधिक चालना द्यावी आणि यासह बीड जिल्ह्याचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचेही यावेळी भाषण झाले. परळीच्या विकासासाठी कोणतेही सहकार्य करायची माझी तयारी आहे. जिल्हा सर्व श्रेत्रात अग्रेसर असावा असे विचार आपण सातत्यांने करतो असेही त्या म्हणाल्या. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी प्रास्ताविक केले. मुंडे यांनी जिल्हाभरात सुरू असलेल्या विविध योजना तसेच उपक्रमाबाबतची माहिती दिली.


सेवेसाठी 580 बसेस : या कार्यक्रमासाठी एस.टी. महामंडळाच्या 580 बसेस लाभार्थ्यांना आणण्यासाठी घेण्यात आल्या होत्या. आजचा मुख्यमंत्री यांचा दौरा हा प्रचंड गर्दीच्या उपस्थिती असल्याचा ठरला. परळी शहरात जागोजागी मोठमोठया कमानी उभारण्यात आल्या होत्या. विविध शासकीय विभागांच्या लाभाच्या योजनांची माहिती देणारे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती : या कार्यक्रमास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर नेत्यांबरोबरच आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार लक्ष्मण पवार, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार नमिता मुंदडा, आमदार संजय दौंड, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, यांच्यासह जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

कोणत्या विकास कामांचा केला शुभारंभ

भूमिपूजन कामे
1) जिल्हाधिकारी कार्यालय, बीड
2) मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, बीड
3) कृषि भवन, बीड
4) संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलोचे वस्तीगृह, बीड
5) संत भगवानबाब ऊसतोड कामगार मुलींचे वस्तीगृह, शिरुर कासार
6) कृषि महाविद्यालय, जिरेवाडी ता. परळी
7) कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, जिरेवाडी ता. बीड
8) सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपक्रेंद, धर्मापूरी ता. परळी
9) एमआयडीसी विस्तार सिरसाळा, ता. परळी
10) श्रीश्रेत्र परळी विकास आराखडा विकास आराखडा कामे
11) परळी बसस्थानक, परळी

हेही वाचा -

  1. Shasan Aplya Dari : 'शासन आपल्या दारी' उपक्रमानं विरोधकांच्या पोटात गोळा
  2. Shasan Aaplya Dari : 'शासन आपल्या दारी' आणि विद्यार्थी वाऱ्यावरी! कार्यक्रमासाठी बसगाड्या सोडल्याने परीक्षा बुडल्या
  3. Shasan Aapya Dari : शासन आपल्या दारी अभियानांतर्गत पस्तीस लाख लाभार्थींना फायदा - मुख्यमंत्री
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.