औरंगाबाद - पैठण तालुक्यातील लिंबगाव येथील एका मत्स्य उत्पादकाच्या शेततळ्यातील हजारो माशांचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकऱ्याचे सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचे हस्ते पैठणमधील संत पीठाचे लोकार्पण; जाणून घ्या, संतपीठाचा 40 वर्षांचा प्रवास कसा झाला?
लिंबगाव ता. पैठण येथील शेतकरी प्रभाकर केशव गाढेकर यांनी गतवर्षी आपल्या शेततळ्यात शेतीला जोड व्यवसाय म्हणून मत्स्यपालन सुरू केले. त्यांनी ३० बाय ३० शेततळ्यात दहा हजार मत्स्यबीज सोडले होते, एक वर्षानंतर मासे एक किलोच्या वजनाचे झाले. मात्र, शुक्रवारी सकाळी त्यांना शेततळ्यातील मासे तडफडून मरताना आढळले.
एका दिवसात जवळपास पाच ते सहा हजार मासे मृत झाले असून राहिलेले माशांचा सुद्धा मृत्यू होत आहे. या व्यवसायावर गाढेकर यांनी आत्तापर्यंत दोन लाख रुपये खर्च केला होता. एक वर्षात माशांच्या खाद्यासाठी दोन लाख रुपये खर्च आला. या माशांना दिवसातून दोन वेळा हे खाद्य दिले जाते. अज्ञात माथेफिरूने विषप्रयोग केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे त्यांचे सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मासे विक्रीतून त्यांना चांगला नफा मिळले, अशी अपेक्षा होती, परंतु आता मात्र त्यांच्या अपेक्षावर पाणी फेरले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ या माशांचा पंचनामा करून शासनाने नुकसान भरपाई द्यावे, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
हेही वाचा - 'काँग्रेसवाले ताप देतात तेव्हा मी भाजपावाल्यांना बोलावतो'; मुख्यमंत्र्यांनी दानवेंच्या कानात केली कुजबुज