अमरावती- दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाळा लवकर सुरू झाला. त्यामुळे, शेतकऱ्यांची पिके बहरली होती. मात्र, परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक हिसकावून नेले. एकट्या पश्चिम विदर्भातील केवळ ५ जिल्ह्यांमधील १ लाख ३० हजार हेक्टरवरील पिके ही पूर्णतः खराब झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीमधून समोर आले आहे. असे असले तरी यापेक्षाही जास्त नुकसान झाल्याची शक्यता कृषी तज्ञांनी व्यक्त केली आहे.
मागील दोन आठवड्यात पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे, काढनीला आलेल्या सोयाबीनच्या पिकाला कोंब फुटली आहेत. तसेच, अती पावसामुळे पिके खराब झाली असून, यंदा सोयाबीन पिकानेच शेतकऱ्यांचे तेल काढले आहे. यवतमाळ जिल्ह्यात कपाशी पिकाचे सर्वाधिक उत्पन्न घेतल्या जाते. मात्र, यावर्षी परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. जास्त पाण्याने कपाशीचे बोंडे पूर्णत: सडले आहे. यंदा कोरोनामुळे कपाशीला भाव नव्हता. त्यामुळे, शेतकऱ्यांनी कमी दराने व्यापाऱ्यांना कापूस विकला. यंदा तरी कापूस उत्पादनातून दोन पैसे मिळतील अशी शेतकऱ्यांना आशा होती, मात्र ती ही मावळली.
अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाचही जिल्ह्यात तबल १ लाख ३१ हजार हेक्टरवरील कपाशी, सोयाबीन, तूर, मुंग, उडीदसह आदी खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ४४ हजार हेक्टर, अकोला ३७ हजार ५०० हेक्टर, बुलडाणा ३८ हजार हेक्टर, वाशिम ९ हजार हेक्टर आणि यवतमाळमध्ये ३ हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे, मागील वर्षी प्रमाणे यंदाही शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी होणार असल्याचे चिन्ह आहे.
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सावनेर गावात परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. गावातील सोयाबीन, कपाशी, तूर, हळद आदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. चांगले पीक येईल या आशेपोटी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून शेती केली. मात्र, त्यांच्या अपेक्षांचा हिरमोड झाला. यानंतर झालेल्या नुकसानीवर कृषी विभागाने लक्ष देणे गरजेचे होते. मात्र, कृषी विभागाचे अधिकारी फिरकलेच नसल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा- केंद्र सरकार आणि कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन