अमरावती - 'जगाचा पोशिंदा, अन्नदाता असणारा शेतकरी आणि शेतमजूर यांना काही उद्योगपतींचे गुलाम बनविणारा कृषी कायदा हा 'काळा कायदा'' असल्याचे सांगत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या कायद्यासह केंद्र शासनाच्या सर्वच 'काळ्या कायद्यां'च्या विरोधात आंदोलन सुरू केल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.
हेही वाचा - खासदार प्रीतम मुंडे यांनी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद
'केंद्र सरकारच्या काळ्या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्था नष्ट होणार असून शेतकऱ्यांना आता हमी भावाचीही हमी राहणार नाही,' असे यशोमती ठाकूर म्हणाल्या. 'शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी जनजागृतीची गरज आहे. केंद्र शासनाने अवघ्या 3 मिनिटांत शेतकरीविरोधी विधेयक पारित केले. आता कॉंग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने गावोगावी जाऊन या विधेयकाच्या गंभीर परिणामांची माहिती शेतकऱ्यांना करून देणे गरजेचे आहे. आज आपण या काळ्या कायद्यांचे गंभीर वास्तव लोकांना सांगितले नाही तर उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही,' असे ठाकूर पुढे म्हणाल्या.
या आंदोलनात प्रदीप देशमुख, संजय सरोदे, महेंद्र गैलवार, विलास वानखडे,नरेंद्र देशमुख, सिद्धार्थ बोबडे, दिलीप काळबांडे, निलेश गुहे, आदी सहभागी झालेत.
हेही वाचा - राहुल गांधी धक्काबुक्की प्रकरण : बीडमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीने व्यक्त केला निषेध