अमरावती: आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात पीक यावे यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा प्रचंड वापर केला जातो. आता मात्र या रासायनिक खतांच्या वापराचा दुष्परिणाम दिसायला लागला आहे. आता रासायनिक खतांचा वापर करणे बंद केले नाही तर येणाऱ्या दहा ते पंधरा वर्षात भारतातील कोणत्याही राज्याची अवस्था खराब होण्याची शक्यता आहे. आपला महाराष्ट्र देखील रेगिस्तान होऊ शकतो, अशी भीती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती आयोजित राज्य कृषी मेळाव्यात व्यक्त केली.
कृषी प्रदर्शनाला उपमुख्यमंत्र्यांनी दिली भेट: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी महोत्सवात विविध बचत गट स्वयंसेवी संस्थांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांच्या उत्पादनाची माहिती घेतली. बचत गटाच्या महिलांची उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्यांच्या कामाची थोडक्यात माहिती देखील यावेळी जाणून घेतली.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री: कृषी प्रदर्शनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज डायबिटीस सह कर्करोगाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आपल्या खानपानात झालेला प्रचंड बदल यासाठी कारणीभूत आहे. पूर्वी लोक ज्वारी आणि बाजरीला महत्त्व द्यायचे. शहरीकरणामुळे ज्वारी आणि बाजरी खाण्याचे महत्त्व कमी झाले. कालचक्र पुन्हा बदलले असून आता श्रीमंत लोक सुद्धा ज्वारी बाजरी कडे वळायला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मिलेट्स महत्त्व दिले असून देशात विविध देशातील जी-20 चे जे सदस्य आले होते त्यांना ताज हॉटेलमध्ये ज्वारी बाजरीच्या पदार्थांचे जेवण उपलब्ध करून देण्यात आले होते. आज संपूर्ण जगाला ज्वारी आणि बाजरीचे महत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे करायला लागले असून येणाऱ्या काळात कर्करोगापासून दूर राहायचे असेल तर ज्वारी बाजरी हाच एकमेव पर्याय असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त: अमरावतीचे पालकमंत्री असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्य कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आले असताना पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात ठाकरे समर्थक कार्यकर्ते व्यत्यय आणू शकतात, अशी भीती असल्यामुळे अमरावती शहरातील सर्वच ठाकरे समर्थक कार्यकर्त्यांना शनिवारी रात्रीच नोटीस बजावण्यात आली होती. तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या घरासमोर पोलीसही पाठविण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कृषी प्रदर्शन अडीच तास बंद ठेवण्यात आले. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असला तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कृषी प्रदर्शन स्थळी उपमुख्यमंत्र्यांनी विरोधात घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले.