ETV Bharat / state

Akola Violence : अकोला हिंसाचार प्रकरणी 100 हून अधिक जण ताब्यात; इंटरनेट सेवा बंद, पोलिसांनी काढला रुट मार्च

author img

By

Published : May 15, 2023, 10:29 PM IST

Akola Violence
Akola Violence

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या धार्मिक पोस्टवरून अकोल्यातील जुने शहर परिसरात शनिवारी रात्री हाणामारी झाली होती. या प्रकरणी पोलिसांना आतापर्यंत 100 हून अधिक जणांना अटक केली आहे. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असून दोन पोलिसांसह 8 जण जखमी झाले आहेत.

पहा हिंसाचाराचा व्हिडिओ

अकोला : अकोला शहरात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी आतापर्यंत 100 हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोन पोलिसांसह 8 जण जखमी झाले आहेत. हा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा दावा राज्यमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य अस्थिर व्हावे अशी काही लोकांची इच्छा आहे, मात्र सरकार त्यांना धडा शिकवेल, असे म्हटले आहे.

शहरात इंटरनेट सेवा बंद : सोशल मीडियावर अफवा पसरू नये म्हणून शहरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तर काही भागात संचारबंदी शिथिल करून शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे, अशी माहिती अकोल्याचे पोलीस अधीक्षक संदिप घुगे यांनी दिली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या धार्मिक पोस्टवरून अकोल्यातील जुने शहर परिसरात शनिवारी रात्री हाणामारी झाली. दोन गटातील सदस्यांनी एकमेकांवर दगडफेक करून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. हिंसाचाराच्या वेळी बेशिस्त जमावाने काही दुचाकी आणि चारचाकी गाड्यांनाही आग लावली, असे एसपी म्हणाले.

100 हून अधिक जण ताब्यात : या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असून दोन पोलिसांसह 8 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आतापर्यंत 100 हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा दंडाधिकारी नीमा अरोरा यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील चार पोलीस ठाण्याच्या भागात कर्फ्यू लावण्याचे आदेश दिले आहे, असे एसपी म्हणाले. सोमवारी सिटी कोतवाली आणि रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भागात संचारबंदी शिथिल करण्यात आली. तथापि, डाबकी रोड आणि जुने शहर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत रात्री 8 ते सकाळी 8 दरम्यान संचारबंदी लागू राहील.

ठार झालेल्याच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत : आदल्या दिवशी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी हा संघर्ष पूर्वनियोजित असल्याचा दावा केला होता. महाजन यांनी रविवारी बाधित भागाचा दौरा केला. त्यांनी हिंसाचारात ठार झालेल्या विलास गायकवाड (40) या व्यक्तीच्या कुटुंबाचीही भेट घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसाचारात ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

ही घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय आहे. काही घरांचे आणि वाहनांचे नुकसान झाले आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. - गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री

राज्य अस्थिर व्हावे अशी काही संघटना आणि लोकांची इच्छा आहे. पण सरकार त्यांना धडा शिकवेल. हे 100 टक्के खरे आहे की काही लोक आणि संघटना आहेत ज्यांना राज्य अस्थिर राहायचे आहे. पण सरकार त्यांचा पर्दाफाश करेल आणि धडा शिकवेल. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुस्लिम मते महाविकास आघाडीकडे वळू नयेत यासाठी महाराष्ट्रात दंगली भडकवल्या जात आहेत. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून जातीय तेढ निर्माण होत आहे. - चंद्रकांत खैरे, माजी खासदार

अहमदनगर जिल्ह्यातही हिंसाचार : अकोल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव गावात मिरवणुकीवर झालेल्या जातीय संघर्षात किमान पाच जण जखमी झाले असून दगडफेकीत अनेक दुकाने आणि वाहनांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी आतापर्यंत 32 जणांना ताब्यात घेतले आहे आणि 150 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

हेही वाचा :

  1. CM Eknath Shinde on Riots : अकोला, शेवगाव दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
  2. DCM on Akola Ahmednagar Violence : अकोला, अहमदनगर दंगल; देवेंद्र फडणवीसांनी दिला इशारा, म्हणाले, सोडणार नाही...
  3. Akola Riots : अकोल्यात दोन समाजाच्या गटामध्ये झालेली दंगल ही पूर्वनियोजित, गिरीष महाजनांना संशय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.