ETV Bharat / state

'माझी वसुंधरा' अभियानात शिर्डी नगरपंचायतीचे वर्चस्व कायम

author img

By

Published : Jun 5, 2021, 8:23 PM IST

शिर्डी नगरपंचायत
शिर्डी नगरपंचायत

साईनगरीने राज्य शासनाच्या 'माझी वसुंधरा अभियान' स्पर्धेतही राज्यातील १२९ नगरपंचायतींना मागे टाकत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आदींची या कार्यक्रमात ऑनलाईन उपस्थिती होती.

अहमदनगर - स्वच्छ सर्वेक्षणात देशपातळीवर आपल्या कामाची मोहर उमटवणाऱ्या साईनगरीने राज्य शासनाच्या 'माझी वसुंधरा अभियान' स्पर्धेतही राज्यातील १२९ नगरपंचायतींना मागे टाकत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत शिर्डी नगरपंचायतीने नगरपंचायत गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. आज (शनिवारी) दुपारी या स्पर्धांचा ऑनलाईन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आदींची या कार्यक्रमात ऑनलाईन उपस्थिती होती.

ऑनलाइन पद्धतीने पुरस्कार प्रदान -

पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'माझी वसुंधरा' स्पर्धेत चार गटात ६८६ ग्रामीण व नागरी संस्थांनी सहभाग घेतला. नगरपंचायत गटात १३० नगरपंचायती या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. यात शिर्डी नगरपंचायतने १ हजार ११३ गुण मिळवून सर्वोत्कृष्ट प्रथम पुरस्कार पटकावला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना ऑनलाईन पद्तीने हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

अभियानात नागरिकांचा सहभाग -

या अभियानात नगरपंचायतीने वृक्षारोपन, घनकचरा व्यवस्थापन, नुतनीकरण, सौर उर्जेचा वापर, ई-चार्जिंग पॉइंट स्थापन करणे, स्वच्छ हवा व विविध क्षेत्रात गेल्या वर्षभर केलेल्या सातत्यपुर्ण कामांमुळे आणि सर्वांच्या सक्रीय सहभागामुळे शहराला प्रथम क्रमांक मिळाल्याचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी सांगितले.

नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिर्डीचे नागरीक, नगरंपचायत पदाधिकारी, अधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नाने हे यश मिळाले आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील-साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साईनगरीने वसुंधरा अभियानात मिळवलेला पुरस्कार अभिमानास्पद आहे. शहरातील नागरिक, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, पदाधिकारी कर्मचारी सर्वजन अभिनंदनास पात्र असल्याचे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.