ETV Bharat / state

Lok Sabha Elections : शिर्डी लोकसभेच्या तिकिटाचा प्रसाद कोणाला मिळणार?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 4:21 PM IST

Lok Sabha Elections : माजी मंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकेर (उबाठा) गटाचे बबनराव घोलप यांनी पक्षात बंडाचं हत्यार उपसल्यानं पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदार संघ चर्चेत आलाय. गेल्या वर्षभरात राज्यात राजकीय समीकरणं बदलल्यानं आगामी लोकसभा निवडणुकीत प्रमुख पक्षातील इच्छुकांनी रस्सीखेच सुरू केलीय.

Lok Sabha Elections
Lok Sabha Elections

नाशिक Lok Sabha Elections : श्रद्धा, सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डी लोकसभा मतदार संघात यंदा निवडणूक तिकीटवरून चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. सध्या शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे या मतदारसंघाचं नेतृत्व करताय. अशात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटात प्रवेश केल्यानं माजी मंत्री बबनराव घोलप नाराज झाले आहेत. त्यामुळं त्यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सगळीकडं रंगली आहे. तसंच महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. मात्र, भाऊसाहेब वाकचौरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानं शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे निर्माण झालीत.


2014 साली काँग्रेसमध्ये प्रवेश : शिर्डी लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेस, शिवसेना यांच्यात लढत पाहायला मिळत होती. 2009 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. त्यावेळी राखीव मतदारसंघात शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले होते. त्यांनी विद्यमान केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांचा पराभव केला होता. मात्र, 2014 मध्ये शिवसेनेची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवबंधन तोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

पुन्हा ठाकरे गटाची धरली वाट : मात्र अचानक (तत्कालीन) शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानं विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी वाकचौरे यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2014 च्या साली वाकचौरेंनी भाजपाचं कमळ हातात घेतलं होतं. 2014 लाच भाजपानं त्यांना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून टिकिट दिलं होतं. मात्र, त्यात देखील वाकचौरेंचा पराभव झाला होता. त्यानंतर वाकचौरे यांनी 2019 मध्ये लोकसभेची अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. यात त्यांच्यावर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढावली होती. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी अशा पल्लीवत झाल्यानं त्यांनी पुन्हा ठाकरे गटाची वाट धरलीय.

शिवसेनेत दोन गट : 2019 मध्ये शिवसेनेनं भाजपासोबत निवडणूक लढवली होती. मात्र त्यानंतर शिवसेनेनं युती तोडत महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन केलं होतं. मात्र, महाविकास आघाडी सरकारला आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. शिवसेनेत बंडखोरी करत विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केलीय. शिवसेनेत दोन गट पडल्यामुळं राज्यात राजकीय समीकरणं बदलली आहेत. तर, सदाशिव लोखंडे शिंदे गटात सामील झाले आहेत. तसंच केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनीही शिर्डीतून उमेदवारी देण्याची इच्छा व्यक्त केलीय. त्यामुळं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदार कोणाच्या गळ्यात माळ टाकणार, हे येणारा काळचं ठरवंल.

महाविकास आघाडीवर विश्वास ठेवा : शिर्डी लोकसभा मतदारसंघात नेहमीच काँग्रेस, शिवसेना यांच्यातच लढत होत असते. त्यामुळे या जागेबाबत महाविकास आघाडीनं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, उमेदवारी देताना महाविकास आघाडीवर विश्वास ठेवावा लागेल. असं स्पष्ट मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय. लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाली असून, भविष्यात राजकीय प्रवेश सोहळे होणार असल्याचा संकेत थोरात यांनी दिलाय. त्यामुळं साईबाबा शिर्डी लोकसभा मतदारसंघात श्रद्धा सबुरीचा संदेश घेऊन मतदार कोणावर विश्वास ठेवतात, हे पाहण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

घोलपांचं टेन्शन वाढलय : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिर्डीत आले होते. त्यांनी बोलताना बबनराव घोलप यांच्या उमेदवारीचे संकेत दिलेत. त्यामुळं घोलप यांनी लोकसभा मतदारसंघात सभा, पक्षाचे कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली होती, मात्र वाकचौरे यांच्या प्रेवेशामुळं घोलपांचं टेन्शन वाढलय.



लोखंडेंची धाकधूक : रामदास आठवले यांचा 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून पराभव झाला होता. शिवसेनेचे भाऊसाहेब वाघचौरे यांना 3 लाख 59 हजार 921 तर, रामदास आठवले यांना 2 लाख 27 हजार 170 मते मिळाली. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांनी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या भाऊसाहेब वाघचौरे यांचा पराभव केला. लोखंडे यांना 5 लाख 32 हजार 936 तर वाघचौरे यांना 3 लाख 33 हजार 14 मते मिळाली. आता केंद्रात भाजपा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची युती आहे. आठवले केंद्रातही मंत्री आहेत. त्यामुळं लोखंडेंची धाकधूक वाढलीय.

हेही वाचा -

  1. Devendra Fadnavis : सत्तेत असताना माशा मारल्या का? देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
  2. Raosaheb Danve Attack On Sanjay Raut : संजय राऊत म्हणजे पिंजऱ्यातला पोपट, मालक दिसल्यावरच 'टिव टिव' करतो; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
  3. Sanjay Raut : 'राज्यात दोन भामटे आणि एका ठगाची युती', संजय राऊतांची जळजळीत टीका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.