ETV Bharat / state

एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलिनीकरण न झाल्याने कर्मचाऱ्याची आत्महत्या; मुख्यमंत्री, परिवहनमंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

author img

By

Published : Oct 29, 2021, 5:23 PM IST

Updated : Oct 29, 2021, 5:39 PM IST

Employee commits suicide due to non-merger of ST employees with the government ahmednagar
एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलिनीकरण न झाल्याने कर्मचाऱ्याची आत्महत्या

या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी शेवगाव आगारात कर्मचारी, विविध सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकवटले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. कामगारांची प्रमुख मागणी ही शासनात विलीनीकरणाची होती. मात्र, ती मान्य न केल्याने काकडे यांनी आत्महत्या केली आहे. याबाबत परिवहनमंत्री अनिल परब आणि राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री हे या आत्महत्येस जबाबदार आहे, असा आरोप करण्यात आला.

अहमदनगर - एकीकडे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासनात विलिनीकरण, महागाई भत्ता वाढ, आणि घरभाडे भत्ता वाढ आदी मागण्यासाठी कामबंद आंदोलन सुरू झाले. यानंतर राज्य शासनाने यातील काही मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन मागे झालेले आहे. मात्र, असे असतानाच आज (शुक्रवारी) अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्याने एसटीबसच्या मागील बाजूस असलेल्या शिडीला गळफास घेत आपले जीवन संपवले. दिलीप हरिभाऊ काकडे असे या आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

प्रतिक्रिया

शेवगाव आगारात मोठे आंदोलन -

या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी शेवगाव आगारात कर्मचारी, विविध सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकवटले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. कामगारांची प्रमुख मागणी ही शासनात विलीनीकरणाची होती. मात्र, ती मान्य न केल्याने काकडे यांनी आत्महत्या केली आहे. याबाबत परिवहनमंत्री अनिल परब आणि राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री हे या आत्महत्येस जबाबदार आहे, असा आरोप करण्यात आला. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक झाली. या भावनेतून काकडे यांनी केलेल्या आत्महत्येस परब आणि ठाकरे जबाबदार असून या दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत आगारात ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी उपस्थित कर्मचारी आणि नागरिक संतप्त झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा झाल्यानंतर आणि त्यांनी गुन्हा दाखल करून घेण्याचे आश्वासन दिले. यानंतर मृतदेह जागेवरून हलवण्यात येऊन ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, आज जिल्ह्यातील अनेक आगारात शासनाविरोधात निषेध सभा घेत कामबंद आंदोलन सुरू असल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे दिलीप लबडे यांनी यावेळी सांगितले.

कृती समितीने केलेली तडजोड अमान्य -

काकडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती समजताच शेवगाव आगारातील एसटी कर्मचारी एकवटले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. काल मुंबईत एसटीच्या विविध संघटनांची कृती समिती आणि परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्यात झालेल्या दीर्घ बैठकीनंतर 16 टक्क्यावरून 28 टक्के महागाई भत्यात वाढ, घरभाडे भत्यात वाढ या दोन मागण्यांवर शासनाने तडजोड करून संप मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर संप मिटल्याचे घोषित केले. मात्र, एकीकडे कृती समितीला शासनाशी तडजोडीचा निर्णय मान्य असला तरी कर्मचाऱ्यांना हा निर्णय मान्य नव्हता. त्यातून सुरू असलेला संप मागे न घेण्याची भूमिका अनेक आगारातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त करत संप सुरूच ठेवला. त्यात अहमदनगर आणि नागपूर अशा दोन ठिकाणाहून एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी बाहेर पडली. त्यात अहमदनगरच्या शेवगाव आगारात चक्क एसटी बसला लटकूनच आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांत संतापाची लाट पसरली आणि अनेक आगारातील कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले.

हेही वाचा - एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये; कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येबाबत अॅड. अनिल परब यांची प्रतिक्रिया

शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे -

शेवगाव आगारात दिलीप काकडे यांच्या आत्महत्येबद्दल महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे आगार सचिव दिलीप लबडे यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल बोलताना सांगितले की, आत्महत्या केलेले काकडे हे नेहमी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण झाले पाहिजे यासाठी आग्रही होते. शेवगाव इथे 24 ऑक्टोबरला झालेल्या संघटनेच्या मेळाव्यात त्यांनी ही भावना बोलून दाखवली होती. परवा सुरू झालेला संप या मागणी शिवाय मागे घेतला जाऊ नये, असे त्यांचे मत होते. या पार्श्वभूमीवर शासनाने शासनात विलिनीकरण ही मागणी पूर्ण न करता महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता वाढ या मुद्यावर संप मिटवला. त्यानंतर आज शुक्रवारी दिलीप काकडे यांनी एसटी बसला लटकून आत्महत्या केली. यानंतर कर्मचाऱ्यामध्ये महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे ही मागणी आग्रही आणि संवेदनशील झाली आहे. त्यामुळे विलिनीकरणाचा निर्णय शासनाने घ्यावा, हीच काकडे यांना खरी श्रद्धांजली असेल, असे संगघटनेचे दिलीप लबडे यांनी स्पष्ट केले.

Last Updated :Oct 29, 2021, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.