नवी दिल्ली - माजी भारतीय खेळाडू मोहम्मद कैफने भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेबाबत आपले मत व्यक्त केले आहे. 'बॉर्डर-गावसकर' कसोटी मालिका भारतीय फलंदाज विरुद्ध ऑस्ट्रेलियन गोलंदाज, अशी लढाई असल्याचे मोहम्मद कैफने ट्विट केले आहे.
काल(शनिवार)पासून बॉक्सिंग डे कसोटी सामना सुरू झाला आहे. भारतीय कसोटी संघाचा पूर्णवेळ कर्णधार वैयक्तिक कारणामुळे मायदेशी परतला आहे. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाची धुरा आहे. काल सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियन संघाला गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. भारताला हा सामना जिंकायचा असेल तर, त्यांनी आक्रमक खेळ करणे गरजेचे आहे, असेही कैफ म्हणाला.
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी) वर सुरू असलेल्या सामन्यात पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा सगळा संघ 195 धावांमध्ये तंबूत परतला होता. त्यानंतर भारताचा डाव सुरू झाला. मात्र, मयंक अग्रवाल शून्यावरच बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. मात्र, त्यानंतर शुबमन गीलने सावध खेळ केला.