ETV Bharat / sports

IND vs SL 2nd Test : आज पिंक बॉल कसोटीचा दुसरा दिवस ; पहिल्या दिवस अखेर श्रीलंकेची धावसंख्या 6 बाद 86

author img

By

Published : Mar 13, 2022, 1:33 PM IST

भारताचा पहिला डाव ( India first innings ) 252 धावांत आटोपला. यजमानांकडून बाद झालेला शेवटचा फलंदाज श्रेयस अय्यर ( Batsman Shreyas Iyer ) होता, त्याने 92 धावा केल्या. त्यानंतर पहिल्या दिवसाच्या समाप्ती पर्यंत श्रीलंका संघाने 6 बाद 86 धावा केल्या आहेत.

IND
IND

बंगळुरु : भारत विरुद्ध श्रीलंका ( India v Sri Lanka ) संघात सध्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याला शनिवारी (12 मार्च) एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. हा सामना बंगळुरु येथे खेळला जात आहे. या डे-नाईट सामन्याचा काल (12 मार्च) पहिला दिवस पार पडला. पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात सर्वबाद 252 धावा केल्या. त्यानंतर पहिल्या दिवसाच्या समाप्ती पर्यंत श्रीलंकेने 6 बाद 86 धावा केल्या आहेत.

श्रीलंकेचा संघ अजूनही भारताच्या 166 धावांनी मागे आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने तीन, मोहम्मद शमीने दोन आणि अक्षर पटेलने एक विकेट घेतली. तत्पूर्वी, गुलाबी चेंडू कसोटीत नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेताना, भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. कारण भारताची सलामी जोडी ( Indian opening pair ) कर्णधार रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल हे स्वस्तात परतले. मयंक (4) धावबाद झाला, त्यानंतर लगेचच कर्णधार रोहित (15) धावा करून अॅम्बुल्डेनियाचा बळी ठरला. तोपर्यंत भारताची धावसंख्या 10 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा होती.

सुरुवातीच्या धक्क्यांनंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आलेल्या हनुमा विहारी आणि विराट कोहली यांनी जबाबदारी स्वीकारली. यादरम्यान दोघांनी एकत्र काही चांगले शॉट्स लावले. ज्यामुळे भारताचा धावफलक हलता राहिला. परंतु दोघांमधील भागीदारी (47) प्रवीण जयविक्रमाने मोडली. विहारी 81 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 31 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कोहली (23) देखील धनंजय डी सिल्वाच्या चेंडूवर पायचित झाला.

यानंतर आलेल्या ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर ( Rishabh Pant and Shreyas Iyer ) यांनी उपाहारापर्यंत चांगला खेळ केल्याने भारताने 29 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 93 धावा जोडल्या. लंच ब्रेकनंतर 93/4 पुढे खेळताना ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी झटपट धावा केल्या. यादरम्यान पंतने श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई करत भारताला शंभरच्या पुढे नेले. पण लसिथ एम्बुल्डेनियाच्या गोलंदाजीवर 39 धावांवर पंतची स्फोटक खेळी संपुष्टात आली. यानंतर रवींद्र जडेजा (4), रविचंद्रन (13) आणि अश्विन अक्षर पटेल (9) लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतले.

त्याचवेळी श्रेयस दुसऱ्या टोकाला राहिला आणि त्याने षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण ( Shreyas Iyer half century ) केले. तोपर्यंत भारताची धावसंख्या आठ गडी गमावून 215 धावा झाली होती. नवव्या स्थानावर आलेल्या मोहम्मद शमीने श्रेयस अय्यरला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण शमी (5) धनंजय डी सिल्वाकरवी झेलबाद झाला. यानंतर श्रेयसने जसप्रीत बुमराहसह वेगवान धावा केल्या, यादरम्यान श्रेयसने अनेक मोठे फटके मारले. पण अवघ्या आठ धावांनी त्याचे शतक हुकले. तो 98 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 92 धावा करून बाद झाला. त्यामुळे भारताचा पहिला डाव 59.1 षटकांत 252 धावांवर संपुष्टात आला.

पहिल्या डावातील भारताच्या 252 धावांना प्रत्युत्तर देताना श्रीलंकेची तिसऱ्या सत्रात खराब सुरुवात ( Bad start for Sri Lanka ) झाली. कारण त्यांचा निम्मा संघ 50 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यादरम्यान कुसल मेंडिस (2), दिमुथ करुणारत्ने (4), लाहिरू थिरिमाने (8), धनंजय डी सिल्वा (10) आणि चरित अस्लंका (5) लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतले. दुसऱ्या टोकाला अँजेलो मॅथ्यूज उभा राहिला. त्याने भारतीय गोलंदाजांविरुद्ध महत्वपूर्ण धावा जोडल्या.

तसेच डिकवेलाने मॅथ्यूजसह अडचणीत आलेल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मॅथ्यूजनेही काही मोठे फटके खेळले, ज्यामुळे त्यांचा धावफलक वाढत गेला. पण मॅथ्यूज फार काळ टिकू शकला नाही. ते बुमराहचा बळी ठरला. त्याने 85 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 43 धावा केल्या, त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने सहा गडी गमावून 86 धावा केल्या. डिकवेला (13) आणि एम्बुल्डेनिया (0) क्रीजवर आहेत.

संक्षिप्त धावफलक :

भारत 59.1 षटकांत 252/10 (श्रेयस अय्यर 92, ऋषभ पंत 39, प्रवीण जयविक्रमा 3/81, लसिथ एम्बुल्डेनिया 3/94).

श्रीलंका 30 षटकांत 86/6 (अँजेलो मॅथ्यूज 43, निरोशन डिकवेला 13, जसप्रीत बुमराह 3/15, मोहम्मद शमी 2/18).

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.