ठाणे - कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Spread) कमी करण्यासाठी एकीकडे राज्य सरकार मास्क आणि लसीकरणाची सक्ती (Mask and Vaccination Compulsory) करत असताना, दुसरीकडे व्यापारी वर्ग मात्र सरकारच्या या भूमिकेच्या विरोधात (Traders oppose Restrictions) आहे. आम्ही मास्क लावणारच नाही अशी अजब भुमिका ठाण्यातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच ठाण्यातील व्यापाऱ्यांनी मार्केट परिसरात सरकारविरोधात मोर्चा काढला. सरकारविरोधात घोषणाबाजी करत सरकारच्या कोरोनासंबंधी नियमांचा विरोध केला.
कुत्रा ,मांजरसारखे प्राणी विना मास्क निरोगी राहू शकतात तर या पृथ्वीवरचा बुद्धिमान प्राणी मात्र जगण्यासाठी मास्क लावतोय ही शोकांतिका असल्याचे अजब वक्तव्य आंदोलनकर्त्यांनी केला. सरकारने अशीच सक्ती केली तर आम्ही न्यायालयात जाऊन सरकारचा विरोध करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे -
न्यायालयाने लसीकरणाबाबत घेतलेली भुमिका ही सर्वांना बंधनकारक आहे. मग बस सेवा, लोकल सेवेत लसीकरण नसल्यास प्रवेश बंदी ही न्यायालयाचा अवमान आहे, असे आज व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहनही आज व्यापाऱ्यांनी पोलिसांना केले आहे.
- आयुर्वेदाचा आधार घ्यावा -
सरकार कोरोनाच्या नावाखाली अनेक विदेशी औषधांना परवानगी देत आहे. यापेक्षा आपल्या देशात उपलब्ध असलेल्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर करून पैसे आणि आरोग्य सुस्थितीत ठेवता येईल अशी भूमिका ही व्यापाऱ्यांनी मांडली. आज प्रजासत्ताक दिनी हे आंदोलन करून सरकारला या वस्तुस्थितीबद्दल जाणीव करून देण्याचा प्रयत्न केल्याचे व्यापारी सांगत आहेत.