ETV Bharat / city

शरद पवारांच्या अंगणात नाना पटोले घेणार ओबीसी मेळावा

author img

By

Published : Jul 15, 2021, 4:52 PM IST

ओबीसी मेळावा
ओबीसी मेळावा

बारामतीमध्ये काही संघटनांकडून ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात 29 जुलै रोजी ओबीसी मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यासाठी संघटनांनी नाना पटोले यांना आमंत्रण दिले. या मेळाव्यासाठी आपण जाणार असल्याचे देखील नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

मुंबई - ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर ओबीसीचे आरक्षण रद्द झाले. ते आरक्षण ओबीसी समाजाला पुन्हा मिळावे यासाठी ओबीसी समाजाकडून वेगवेगळे आंदोलन, मोर्चे आणि मेळावे घेतले जात आहेत. बारामतीमध्येही काही संघटनांकडून ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात 29 जुलै रोजी ओबीसी मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यासाठी संघटनांनी नाना पटोले यांना आमंत्रण दिले. या मेळाव्यासाठी आपण जाणार असल्याचे देखील नाना पटोले यांनी स्पष्ट केले. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर आंदोलन मोर्चे आणि मेळावे घेतले जात आहेत. राज्यभरात कोठेही ओबीसी आरक्षणाबाबत आंदोलन किंवा मेळावे होत असेल, त्याठिकाणी मला आमंत्रीत केल्यास मी नक्की जाईल, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

बारामती काही केंद्रशासित प्रदेश नाही -
ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्यामुळे बारामतीत या निर्णयाचा विरोध केला जाणार आहे. 29 जुलै रोजी बारामतीत मेळावा घेतला जातो. आहे. बारामती काही केंद्रशासित प्रदेश नाही, तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा देखील काही राजकीय प्रश्न नसून या सामाजिक प्रश्नावर काही संघटना आक्रमक आहेत. यासाठी बारामतीत मेळावा घेतला जाणार असून आपण त्यात सहभागी होणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

शरद पवार हे नाना पाटोलेंवर नाराज असल्याची चर्चा

नाना पटोले यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यावरून शरद पवार हे नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील आणि मंत्री अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र प्रदेशाध्यक्ष असूनही नाना पटोले या भेटीदरम्यान उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. तसेच नाना पटोले हे लहान नेते आहेत, त्यामुळे त्यांच्यावर मी भाष्य करणार नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी याआधी केले होते. त्यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला धोका दिला असल्याचे खळबळजनक वक्तव्य नाना पटोले यांच्याकडून करण्यात आले. त्यामुळे शरद पवार आणि नाना पटोले यांच्यात वाद सुरू आहेत का, असे प्रश्न आघाडी सरकारमध्ये उपस्थित केले जात होते.

हेही वाचा - अहो, ऐकलं का? केवळ ५०० रुपयांत लग्न, SDO आणि लष्करातील मेजरचा समाजासमोर आदर्श

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.