ETV Bharat / city

ईटीव्ही विशेष : नवाब मलिक बनले महाविकास आघाडीचे 'हिरो'!

author img

By

Published : Oct 26, 2021, 8:25 PM IST

Updated : Oct 26, 2021, 8:46 PM IST

ETV Special: Nawab Malik becomes Mahavikas Aghadi's 'Hero'!
ईटीव्ही विशेष : नवाब मलिक बनले महाविकास आघाडीचे 'हिरो'!

राज्य सरकारमधील विविध मंत्र्यावर सीबीआय, आयकर विभागाकडून चौकशीचा ससेमिरा लावला आहे. किरीट सोमैया यांनीही अनेक प्रकरणावरून ईडी चौकशीची मागणी करत राज्य सरकारला कोंडीत पकडले आहे. राज्यातील नेते, मंत्री धास्तावले होते. वानखेडे प्रकरणावरून सध्या राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री यांनी संपूर्ण प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे ओढून घेतला आहे. त्यामुळे नवाब मलिक हे महाविकास आघाडीचे 'हिरो' ठरले आहेत.

मुंबई - वानखेडे प्रकरणावरून सध्या राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री यांनी संपूर्ण प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे ओढून घेतला आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर, राम कदम, नारायण राणे, त्यांचे दोन्ही सुपुत्र, चित्रा वाघ महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर आरोपांची राळ उठवत होते. परंतु, आघाडीचे नेते जोरदार प्रत्युत्तर देत नव्हते. आता समीर वानखेडे प्रकरणावरून नवाब मलिक देत असलेले प्रत्युत्तर पाहता महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांत आपणही तोडीस-तोड उत्तर देऊ शकतो असे बळ निर्माण होऊ लागले आहे. नवाब मलिक हे म्हणूनच महाविकास आघाडीचे 'हिरो' ठरले आहेत.

राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांची प्रतिक्रिया
  • भाजपा विरोधात नवी उमेद -

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकला जात होता. अनेक नेत्यांवर आणि मंत्र्यांवर, नातेवाईक, मित्रांची ईडी, एनसीबी, सीबीआय, आयकर विभागाकडून चौकशीचा ससेमिरा लावला आहे. किरीट सोमय्या यांनीही अनेक प्रकरणावरून ईडी चौकशीची मागणी करत राज्य सरकारला कोंडीत पकडले आहे. राज्यातील नेते, मंत्री धास्तावले होते. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कारवाई टाळण्यासाठी भाजपा सोबत युती करावी, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. यावरून भाजपाच्या आरोपांचा दबाव वाढल्याचे स्पष्ट दिसत होते. शिवसेनेचे नेते संजय राऊत वगळता महा विकास आघाडीतील कोणी नेता भाजपा विरोधात उघडपणे बोलण्यास तयार नव्हता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आक्रमकपणे वानखडे प्रकरणाला दिलेले प्रतिउत्तर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्याना भाजपा विरोधात लढण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे.

  • भाजपाचा आक्रमक सूर मावळला -

कार्डलिया क्रुझवर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने टाकलेल्या छाप्यात सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसहित सात जणांना ताब्यात घेतले. आतापर्यंत ड्रग्स प्रकरणी सुमारे वीस जणांना ताब्यात घेतले आहे. भाजपाने या प्रकरणावरून महाविकास आघाडीवर घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सुरुवातीपासूनच एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे आणि एनसीबी अधिकाऱ्यांच्या कारवाईवर सांशकता निर्माण करत व्हिडिओ फोटोद्वारे कारवाईचे बिंग फोडले. यानंतर भाजपाने याला जातीय आणि धार्मिक रंग दिल्याचा आरोप करत नवाब मलिक यांच्यावर टीका केली. मात्र नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र सादर केल्याने भाजपाचा आक्रमक सूर मावळला आहे.

  • भाजपा बॅफूटवर -

सरकार स्थापनेपासूनच केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष लक्ष्य केले होते. तत्कालीन गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग करून भाजपाला सहकार्य केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तर दुसरीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी पोलिस आयुक्त अनिल देशमुख यांच्यावरती १०० कोटी रुपये वसुलीचे आरोप केले. भाजपाच्या नेत्यांनी महा विकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. मात्र परमबीर सिंग यांच्यावरच पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले. हे प्रकरण अंगलट येताच परमबीर सिंग यांनी राज्यातून पळ काढला आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर आरोप करणारी आता भाजपा बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे.

  • नोकरशाही, न्यायव्यवस्थेला पोहोचणार झळ -

केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या वेगवेगळ्या एजन्सीमार्फत राज्यातल्या सरकारच्या नेत्यांच्या, मंत्र्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. राज्यसरकार यामुळे बॅकफूटवर गेल्याचे चित्र दिसत होतं. मात्र आर्यन खानच्या अटकेनंतर राज्य मंत्रिमंडळातील एक मंत्री नवाब मलिक यांनी मोठ्या प्रमाणावर काही गोष्टी शोधून काढून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमवर आरोप केले. यामुळे महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या एजन्सीच्या कारवाई विरोधात ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. यापूर्वी काही मोजकी लोक सोडली तर सरकारमधील अनेक मंत्री, नेते बोलण्यास घाबरत होते. मात्र, आता ठामपणे हे सरकार केंद्र विरोधात उभे राहत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात एक सामना पाहायला मिळतो आहे. नोकरशाही, न्याय व्यवस्थेबरोबर इतरही काही क्षेत्राला या संघर्षाची झळ पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे, असे राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी सांगितले.

हेही वाचा - मलिकांनी "ते" निनावी पत्र एनसीबीच्या महासंचालकांना पाठवले

हेही वाचा - आमची लढाई एनसीबीशी नसून, समीर वानखेडेंसारख्या भ्रष्ट लोकांशी - नवाब मलिक

हेही वाचा - मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर नवाब मलिकांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Last Updated :Oct 26, 2021, 8:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.