मेंदू हा शरीरातला सर्वात गुंतागुंतीचा अवयव आहे. आपल्या शरीराचे कार्य चांगले राहण्यासाठी सतत अनेक नसा एकत्रपणे अव्याहतपणे काम करत असतात. नेहमीच वेगाने चालणाऱ्या या जगात छोट्या छोट्या गोष्टींची नोंद ठेवणे हे एक मोठे आव्हान आहे. गोष्टींचा मागोवा न ठेवता येणे आणि त्या न आठवणे यामुळे नैराश्य येऊ शकते. म्हणूनच ई टीव्ही सुखीभवच्या टीमने आयुर्वेदाच्या इतिहासात पीएचडी केलेल्या डाॅ. पी. व्ही. रंगनायकुलू यांच्याशी संवाद साधला. त्यांनी स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी काही सल्ले दिले आहेत.
डॉ. रंगनायकुलू म्हणाले की, स्मरणशक्तीच्या कार्यात तीन स्टेप्स असतात. स्वीकार, नोंदणी आणि आठवण. आपल्याला जेव्हा माहिती मिळते तेव्हा स्वीकार हा स्पष्ट हवा आणि त्या माहितीची मेंदूमध्ये चांगल्या प्रकारे नोंद होईल आणि एकदा का माहितीची नोंद झाली की मग गोष्टी, घटना आठवणे कठीण नाही. पण या गोष्टी या क्रमाने झाल्या नाहीत तर मग आपली स्मरणशक्ती काम करेनाशी होते आणि आपल्याला वेळेवर आठवत नाही. तुम्हाला वेळेवर आठवणे हे चांगल्या स्मरणशक्तीचे लक्षण आहे.
स्मरणशक्तीसाठी खाद्यपदार्थ
डॉ. रंगनायकुलू सांगतात की, स्वच्छ लोणी किंवा गायीचे तूप हे ‘ मेधा ’ म्हणून ओळखले जाते. यामुळे स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता यांचे संवर्धन होते. हे पदार्थ प्राथमिक समजले जातात. तूप हे प्रत्येक घरात वापरले जाते. आपण खात असलेली आमटी, डाळ, रोटी, चपाती यात तूप घातले जाते. स्मरणशक्ती आणि बुध्यांक वाढण्यासाठी ब्रह्मी, शंखपुष्पी आणि मल्कनगनी या वनस्पती उपयोगी आहेत. वाचा वनस्पतीमुळे स्मरणशक्ती संवर्धन होते आणि बोलण्याची काही समस्या असेल तर ही वनस्पती उपयोगी पडते. याशिवाय शरीराचे वजन वाढवणारे पदार्थ किंवा कफ वाढवणारे पदार्थ स्मरणशक्तीसाठीही चांगले आहेत. हळदीमुळेही स्मरणशक्ती वाढते, असे म्हटले जाते. पण हे अजून सिद्ध झाले नाही.
इतर काही टिप्स
- आहारात साखर आणि कार्बोहायर्डेड कमी करा. संशोधनातून हे समोर आले आहे की तुमच्या आहारात जास्त साखर असेल तर तुमची स्मरणशक्ती कमी होते. अल्झायमरची लक्षणे लवकर दिसू लागतात.
- शांत झोपणे हाही चांगला उपाय आहे. अभ्यासातून हे समोर आले आहे की, ज्या लोकांना झोप नीट मिळत नाही, त्यांच्या स्मरणशक्तीवर वाईट परिणाम होतो. ७ ते ९ तास शांत झोप मिळाली की तुमची स्मरणशक्तीही चांगली होते.
- व्यायाम केल्याने तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते. नियमित व्यायामाने आयुष्यात पुढे कधी डिमेन्शिया होण्याचा धोका कमी होतो.
- आहारात अँटीऑक्सिडंट्सचा समावेश केल्याने वाढत्या वयानुसार मेंदूच्या पेशींमध्ये बिघाड होण्यास प्रतिबंध होतो. फळे आणि भाज्या, विशेषत: बेरी यात भरपूर अँटिऑक्सिडेंट असतात आणि त्यांचे सेवन केल्याने स्मरणशक्ती नष्ट होण्यास आळा बसतो.
त्याचबरोबर “ प्रत्येकाने आरामात वेळ घालवण्यापेक्षा जास्त पुस्तके वाचावीत. तणावरहित आयुष्य जगावे आणि शांत मन असेल तर तुमच्या स्मरणशक्तीचे संवर्धन होते. ” असे मत डॉ. रंगनायकुलू यांनी व्यक्त केले.