महाराष्ट्र

maharashtra

अंगणवाडीतून यायचं आहे पहिल्या वर्गात; चिमुकल्यांचा बघूया बौद्धिक आणि भावनिक विकास - Preschool Preparation Campaign

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 10:43 PM IST

Preschool Preparation Campaign: विद्यार्थ्यांचं पहिलीपासून सुरू होणारं शिक्षण सहज, सुलभ आणि सोपं होणं अपेक्षित आहे. जेणेकरून त्यांना शिक्षणाची भीती वाटू नये, तसंच त्यांची मानसिक तयारी करून घेणं आवश्यक आहे. त्यामुळं 'शाळापूर्व तयारी अभियान' राबवण्यात येत आहे.

Preschool Preparation Campaign
शाळापूर्व तयारी अभियान

अमरावती येथे शाळापूर्व तयारी अभियान

अमरावती Preschool Preparation Campaign: शाळापूर्व तयारी अभियाना अंतर्गत 'पहिले पाऊल' हा विशेष कार्यक्रम राज्यात विभागीय स्तरावर राबविला जात आहे. आज अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ या गावात यानिमित्तानं विभागीय मेळावा आयोजित करून अंगणवाडीतून इयत्ता पहिलीत येणाऱ्या चिमुकल्यांचा शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि भाषा विकास नेमका कोणत्या स्तरावर आहे. यासह त्यांच्या कौशल्याची चाचपणी करून त्यांना इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यासंदर्भात निर्णय घेतला जातो. या विशेष अभियानात चिमुकल्यांसह गमती जमतीत का होईना मात्र, त्यांचे पालक आणि अंगणवाडी सेविकांची देखील परीक्षाच घेण्यात आली.



असं आहे हे अभियान: 'पहिले पाऊल' या उपक्रमा अंतर्गत अंगणवाडीतून इयत्ता पहिलीत येणाऱ्या चिमुकल्यांना अक्षर ओळखता येतं का, फळभाज्यांची त्यांना नावे माहिती आहेत का? यासोबतच आपल्या नातेवाईकांची ओळख ते व्यवस्थित सांगतात का आणि काही जाणून घेण्याच्या आवडीसोबतच खेळण्यात देखील त्यांची किती रुची आहे याची माहिती शिक्षकांकडून घेतली जाते. या अभियानांतर्गत अमरावती विभागाचा खास मेळावा नांदगाव पेठ या गावातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या आवारात मंगळवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. असाच उपक्रम प्रत्येक शाळेत देखील छोट्या स्तरावर आयोजित करून अंगणवाडीतून इयत्ता पहिलीत येणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता या निमित्तानं तपासली जात आहे.



चिमुकल्यांच्या आरोग्यबाबतही जागृती: केवळ शाळेत प्रवेश द्यायचा हा एकमेव उद्देश या अभियानाचा नाही तर चिमुकल्यांच्या आरोग्यासंदर्भात पालक किती जागृत आहेत याची माहिती घेऊन पालकांना योग्य मार्गदर्शन देखील शिक्षकांच्या माध्यमातून या अभियानाद्वारे केलं जात आहे. वयानुसार एखाद्या विद्यार्थ्याचं नेमकं किती वजन आहे, त्याची किती उंची आहे, याची सर्वात आधी तपासणी केल्यावरच त्याच्या बौद्धिक क्षमतेची चाचणी घेतली जाते. घरातल्या अगदी छोट्या छोट्या वस्तूंची चिमुकल्यांना माहिती आहे का? हे देखील या अभियानांतर्गत जाणून घेण्यात आलं. विशेष म्हणजे पालक आपल्या मुलांसोबत घरात खरंच किती आणि कसा संवाद साधतात याची माहिती देखील या उपक्रमांतर्गत शिक्षकांकडून जाणून घेण्यात आली.

काय आहे उद्देश : नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी यास प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यामुळंच इयत्ता पहिलीत शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळेची सुरुवात ही उत्साहवर्धक आणि आनंददायी व्हावी हाच या अभियाना मागचा खरा उद्देश असल्याची माहिती, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

100 च्यावर पालक सहभागी : या सोहळ्याला अकोल्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी अमरावतीचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुमार जोशी, शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे, अमरावती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, शिक्षणाधिकारी निखिल मानकर उच्चशिक्षणाधिकारी गजाला खान प्रामुख्याने उपस्थित होते. नांदगाव पेठ आणि लगतच्या गावातील 100 च्यावर पालक आपल्या चिमुकल्यांसह या सोहळ्यात सहभागी झाले.

हेही वाचा -

  1. वसंत फुलताना...पानगळीतही फुलांनी बहरला मेळघाट, पर्यटकांना करतोय आकर्षित
  2. मेळघाटात व्याघ्र दर्शन; कोलकास- सेमाडोह परिसरात पर्यटकांनी अनुभवला थरार
  3. काय सांगता! मेळघाटात चक्क आंब्याच्या झाडाला दाढी; दाढीवाला आंबा अशी खास ओळख

ABOUT THE AUTHOR

...view details