महाराष्ट्र

maharashtra

मनोज जरांगेंची तब्येत खालावली, मराठा आरक्षणाकरिता संतप्त आंदोलकांचा धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2024, 8:18 PM IST

Maratha Agitation: मराठा समाजानं जालनामध्ये धुळे-सोलापूर महामार्गावर चक्का जाम आंदोलन करत 'रास्ता रोको' केलाय. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. त्यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळं अंतरवाली सराटीतून मराठा समाज आक्रमक होत थेट महामार्गावर आला आणि 'रास्ता रोको' केलाय.

Maratha Agitation
मराठा आंदोलन

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे आंदोलन

जालना Maratha Agitation: संपूर्ण राज्यभरात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन होत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील वेळोवेळी आंदोलन आणि उपोषण करत आहेत. पण याचा काही फायदा झाला नसल्याचा आंदोलकांचा दावा आहे. 27 जानेवारीला वाशी येथे आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आदेश दिले आणि अध्यादेशही काढला. पण लाखो मराठ्यांना घेऊन जरांगे पाटील पुन्हा एकदा सरकारच्या जाळ्यात अडकले. हा फक्त जरांगे यांनी मुंबईत येऊ नये यासाठी आखलेला प्लान होता, अशी मराठा समाज बांधवांमध्ये भावना आहे. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर 10 फेब्रुवारीला अंतरवली सराती येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून राजकारण तापलयं.

जरांगे पाटलांनी उपचार नाकारले: सकल महाराष्ट्र समाजानं बुधवारी महाराष्ट्र बंदचे सोशल मीडियातून आवाहन केले. आज (15 फेब्रुवारी) जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा 6वा दिवस आहे. पण मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय उपचार नाकारले. त्यांनी सरकार विरोधात जोरदार टीका केली. या सगळ्या प्रकारामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मराठा समाजाकडून जोरदार टीका केली जात आहे. जरांगे पाटलांची तब्येत पुन्हा खालावल्यानं राज्यातील मराठा रणरागिणी भगिनींनी आक्रमक भूमिका घेत सरकारला बांगड्या भेट देणार असल्याचं जाहीर केलंय. मात्र, सरकारनं सध्या तरी तोंडावर बोट आणि हाताची घडी अशीच भूमिका घेतली आहे.

बंदला ग्रामीण भागातून प्रतिसाद:सकल मराठा समाज आणि सर्व मराठा समाज संघटनांच्यावतीनं पुकारलेल्या बंदला जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद ठेवून मराठा आरक्षणास व्यापारी, शेतकरी, हमाल, मापाडी यांनी पाठिंबा दिला. बाजार समितीत कडकडीत बंद होता. तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यासह अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद या तालुक्यातील ग्रामीण भागातील व्यवहार बंद होते. तर जालना ते जळगाव महामार्गावर सागर वाडी येथे टायर जाळून मराठा आरक्षणावर सरकार विरोधात मराठा समाज बांधवांनी आंदोलन केलं.

हेही वाचा:

  1. अमरावती : कारागृहातील कैद्यांनी अवघ्या दहा महिन्यात पिकवला पंधरा लाखांचा भाजीपाला
  2. राज्यसभेच्या सहा जागांसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल; राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
  3. इलेक्टोरल बाँडबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लोकशाही वाचवणारा, विरोधी पक्षानं केलं निर्णयाचं स्वागत

ABOUT THE AUTHOR

...view details