नवी दिल्लीSandeshkhali Violence: पश्चिम बंगालमधील संदेशखळी गावात महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 19 फेब्रुवारीला म्हणजेच उद्या सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती बी.व्ही नागरत्ना तसंच न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. संदेशखळी लैंगिक हिंसाचार प्रकरणाची सुनावणी 16 फेब्रुवारीला करण्याचं न्यायालयानं मान्य केलं होतं. संदेशखळी लैंगिक हिंसाचाराचा तपास पश्चिम बंगालच्या सीबीआय किंवा एसआयटीकडं सोपवावा, अशी मागणी याचिकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडं केली आहे. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याचं देखील आवाहन त्यांनी न्यायलयाला केलं होतं. मात्र न्यायालयानं त्यावर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला होता.
- शाहजहान शेख फरार :संदेशखळी येथील महिलांनी टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. शाहजहान शेख महिलांना वासनेचा शिकार बनवायचा, असं महिलांचं म्हणणं आहे. मात्र, रेशन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या छापेमारीनंतर शाहजहान शेख फरार आहे.
आतापर्यंत 18 जणांना अटक :जमीन बळकावणं तसंच महिलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी तीन मुख्य आरोपी आहेत. यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. TMC नेते शिबाप्रसाद हाजरा तसंच उत्तम सरदार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 18 जणांना अटक करण्यात आली आहे.
लैंगिक छळ प्रकरणाबाबत गदारोळ :संदेशखळी लैंगिक छळ प्रकरणाबाबत 16 फेब्रुवारीला बराच गदारोळ झाला होता. भाजपाच्या शिष्टमंडळानं संदेशखळीत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखले होतं. भाजपाचे कार्यकर्ते परतल्यानंतर काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी संदेशखळीत जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांनाही रोखलं होतं. यावरून काँग्रेस कार्यकर्ते, पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती. यानंतर अधीर रंजन चौधरी रामपूरमध्ये संपावर बसले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, संदेशखळीची खरी घटना काय आहे? हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे.