नांदेड : तृतीयपंथीय अथवा किन्नर म्हटले की डोळ्यासमोर टाळ्या वाजवून पैसे मागणारे व्यक्ती समोर येतात. परंतु, निसर्गाने दिलेल्या या व्यंगामुळे रडत न बसता लढण्याची जिद्द ठेवून नांदेडमधील अमोलने (सेजल) बारावीत ६२ टक्के गुण मिळविले आहे. मराठवाड्यातून नांदेड जिल्ह्यातील पहिल्यांदाच तृतीयपंथी व्यक्तीला एवढे यश मिळाला आहे. तिने बारावीसाठी उच्च माध्यमिक आश्रमशाळा, शिवाजीनगर तांडा ता. जळकोट, जि.लातूर येथे प्रवेश घेतला. तिचे वडील ऑटोरिक्षा चालवून कुटुंबाचा उदर्निवाह चालवतात. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही कोणत्याही खासगी शिकवण्या न लावता स्वत: अभ्यास करून यश मिळविले. तृतीयपंथीय असल्याने होणारी नकारात्मक टिप्पणी टाळण्यासाठी सेजलने आपल्या गुरूकडे हैदराबाद येथे राहण्याचा निर्णय घेतला. समाजामध्ये तृतीयपंथीयांना समानतेची वागणूक मिळत नाही. तरी देखील अमोल सर्जे (सेजल) ही पुढे आता समाजसेवामध्ये काम करू पाहते आहे. शासनाच्या योजनेत तृतीयपंथियांचाही समावेश करावा, अशी सेजलने अपेक्षा व्यक्त केली आहे.