बारसू(रत्नागिरी) :रिफायनरीविरोधात बारसू येथे सुरू असलेले आंदोलन आज तापले. रत्नागिरी रिफायनरी सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्याशिवाय अंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचे नळकंडे फोडले आहेत. पोलिसांच्या या कारवाईत अनेक ग्रामस्थ जखमी झाले. पोलिसांच्या कारवाईनंतर जिल्हाधिकारी, कोकण परिमंडळाचे पोलिस महानिरीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेच. त्यांनी आंदोलकांना चर्चेचे आवाहन केले. मात्र, ग्रामस्थांनी याकडे पाठ फिरवली आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह आंदोलनस्थळी उपस्थितांना चर्चेचे आवाहन केले. मात्र, स्थानिकांनी चर्चेवर बहिष्कार टाकला. गेल्या काही दिवसांपासून बासूर प्रकल्पासंदर्भात माती सर्वेक्षण सुरू आहे. त्याला स्थानिकांनी विरोध केला आहे. मात्र, प्रशासन, पोलिसांकडून आंदोलकांवर दडपशाही सुरूच असल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जिल्हाधिकारी म्हणाले की, कोकण विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांनी प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्या कार्यकर्त्यांना सोडण्यात येईल. याबाबत गेल्या महिन्याभरापासून प्रशासनाकडून चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांनी सांगितले. या प्रकल्पाबाबत लोकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गुरुवारी राजापुरात प्रशासन, रिफायनरी समर्थक, विरोधी संघटनांची बैठक झाली. या बैठकीत तज्ज्ञांचाही सहभाग होता.