जळगाव - जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने बोरी नदीला मोठा पूर आला आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. पुरामुळे प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमळनेर शहरातील वाडी संस्थानची तिन्ही मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. मुसळधार पावसामुळे बोरी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्यावतीने केले आहे.