वर्धा - महाराष्ट्र राज्य अंगणवाडी आणि बालवाडी संघटना तसेच आयटक संघटनेच्या वतीने एकत्र येत वर्ध्यातील 600 अंगणवाडी सेविकांनी आपले मोबाईल प्रकल्प अधिकाऱ्यांना परत सोपावले. यामुळे अंगणवाडी सेविकांचे कामकाज बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
600 अंगणवाडी सेविकांनी मोबाईल प्रशासनाला केले परत मोबाईल निकृष्ट दर्जाचे
मोबाईल परत देण्यासाठी वर्ध्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ सर्व अंगणवाडी सेविकांचे मोबाईल एकत्र करण्यात आले. नंतर ते मोबाईल प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले. शासनाने दोन वर्षांपूर्वी मोबाईल दिले होते. पण हे मोबाईल निकृष्ट दर्जाचे आहेत. हँग होणे, गरम होणे, बंद पडणे, आपोआप डिस्प्ले जाण्याचे प्रकार घडतात. चांगल्या प्रतीचा, चांगल्या दर्जाचा मोबाईल द्यावा, अशी मागणी करत मोबाईल परत करण्यात आले आहेत.
मोबाईल दुरूस्तीचा खर्चच पगाराइतका
अंगणवाडी सेविकांना गावपातळीवरील माहिती यासह अन्य कामकाजासाठी शासनाकडून मोबाईल देण्यात आले आहेत. पण मागील दोन वर्षांपासून हे मोबाईल वापरण्यात असल्याने आता त्यात बिघाड येऊन मोबाईल नादुरूस्त होऊ लागले आहे. यात मात्र कामात खोळंबा येऊ नये म्हणून दुरुस्तीसाठी नेले असताना त्याचा दुरूस्तीचा खर्च हा जवळपास त्यांना मिळणाऱ्या एका महिन्याच्या पगाराइतका आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांना हा आर्थिक भुर्दंड सहन करणे अशक्य आहे. त्यामुळे शासनाने चांगल्या दर्जाचे मोबाईल द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा -तृतीयपंथींचा धिंगाणा, घरात घुसून तोडफोड; महिला-मुलांनाही मारहाण