ETV Bharat / state

पालघरच्या खलाशाचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू; दीड महिन्यानंतरही मृतदेह कराचीतच - Fisherman Death in Pakistan Jail

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 10:08 PM IST

Palghar News
खलाशाचा तुरुंगात दुर्दैवी मृत्यू

Palghar News : पाकिस्तानच्या तुरुंगात (Pakistan Jail) असलेल्या पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील एका खलाशाचा तुरुंगातच मृत्यू झाल्याची घटना घडली. विनोद लक्ष्मण कोल (55) असं या मृत खलाशाचं नाव आहे. दीड महिन्यानंतरही विनोद यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना मिळालेला नाही.

पालघर Palghar News : मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या आणि नंतर पाकिस्तानच्या तुरुंगात (Pakistan Jail) असलेल्या डहाणू तालुक्यातील एका खलाशाचा मृत्यू झालाय. दीड महिना झाला तरी त्यांचा मृतदेह अजूनही कुटुंबियांना मिळालेला नाही. त्यामुळं कुटुंबियांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पाकिस्तानात अटक : गेल्या दोन वर्षांपूर्वी मासेमारी करताना कोल हे भारताची हद्द ओलांडून पाकिस्तानच्या समुद्री हद्दीत गेले होते. पाकिस्तानात त्यांना अटक करण्यात आली होती. खलाशांच्या अदलाबदलीतही त्यांची सुटका झाली नाही. त्यामुळं ते पाकिस्तानात राहिले होते. आता त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यानं कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. विनोदच्या पश्चात त्यांची पत्नी सखू तसेच भारती (विवाहित), मालती, वृतिका, कल्पित या मुली आणि चिराग आणि पिंटू हे मुले आहेत.

सात खलाशी डहाणू तालुक्यातील : विनोद आणि त्यांचे सहकारी २५ सप्टेंबर २०२२ रोजी गुजरातच्या ओखा बंदरातील मत्स्यगंधा ही मासेमारी बोट घेऊन मासेमारीसाठी अरबी समुद्रात गेले होते. चुकून त्यांनी भारताची हद्द ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला होता. पाकिस्तानच्या तटरक्षक दलानं त्यांना २७ सप्टेंबर २०२२ रोजी अटक केली. त्यात नऊ खलाशी होते. त्यातील सात खलाशी हे डहाणू तालुक्यातील आदिवासी होते.

‘हे’ खलाशी पाकिस्तानी तुरुंगात : नवश्या महाद्या भिमरा, सरिता सोन्या उंबरसाडा, कृष्णा रामज बुजड, विजय मोहन नगवासी, विनोद लक्ष्मण कोल, जयराम जान्या सालकर, उधऱ्या रमण पाडवी यांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी विनोद यांचा कराची येथील तुरुंगात मृत्यू झाला. त्यांना आठ मार्च रोजी स्नानगृहात अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतर उपचार सुरू असताना १८ मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

तीस तारखेला मृतदेह भारतात : विनोद यांच्या मृत्यूची बातमी कळताचं त्यांचे कुटुंबीय मानसिक तणावात होते. विनोद यांच्या मागे त्यांची पत्नी सखू तसेच मालती, वृत्तिका, कल्पित या मुली आणि चिराग आणि पिंटू ही दोन मुले आहेत. "आम्हाला कोणतीही मदत नको, फक्त मृतदेह ताब्यात द्या," अशी मागणी विनोद यांच्या कुटुंबियांनी केली. ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांनी याबाबत चौकशी करून, विनोद यांचा मृतदेह तीस एप्रिल किंवा एक मे रोजी भारतात येणार असल्याचं सांगितलं.

१८३ भारतीय कैदी पाकिस्तानात : सध्या भारतातील एकूण १८३ कैदी पाकिस्तानच्या वेगवेगळ्या तुरुंगात आहेत. त्यापैकी ३५ कैद्यांची तीस तारखेला सुटका करण्यात येणार असल्याची माहिती देसाई यांनी दिलीय. मच्छीमार खलाशी गरीब असून पोटाची खळगी भरण्यासाठी समुद्रात जात असतात. त्यांना समुद्रात असताना भारत आणि पाकिस्तानची सामुद्रिक सीमारेषा कळत नाही. मासे ज्या ठिकाणी सापडतात, तेथे मासेमारी करण्यासाठी जातात. त्यामुळं त्यांना अटक करणं चुकीचं आहे. प्राथमिक चौकशी करून त्यांना पुन्हा त्यांच्या देशात सोडलं पाहिजे, अशी मागणी देसाई यांनी केलीय.



हेही वाचा -

स्मशानभूमीची भींत ठरली यमदूत; भींत कोसळल्यानं चार जणांचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद - Cremation Wall Collapse

झारसुगुडा बोट अपघात: ओडिशात बोट उलटून सात प्रवाशांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता - Jharsuguda Boat Mishap

कर्नाटकच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; क्रूझर ट्रॅव्हल्सवर आदळून 5 जण ठार, तर 15 जण जखमी - Sangli Road Accident

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.