महाराष्ट्र

maharashtra

सिंधुदुर्ग : सलग 4 दिवस पडला विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

By

Published : Nov 23, 2021, 5:20 PM IST

सिंधुदुर्ग भातशेतीचे नुकसान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेती हा प्रमुख शेती व्यवसाय आहे. सध्या भात शेती पूर्णत: पिकून तयार झालेली असताना तिच्या कापणीचा हंगाम सुरू आहे. याचदरम्यान भात शेती कापण्यात येथील शेतकरी व्यस्त असताना पडणाऱ्या पावसामुळे कापलेले भात भिजून मोठे नुकसान झाले आहे. तर हापूस मोहरत असताना ढगाळ वातावरण आणि पावसाचा परिणाम या मोहरावर होत असून आंबा पिकावर त्याचा मोठा परिणाम होणार असल्याची माहिती बागायतदारांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात सलग 4 दिवस सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस (unseasonal rain) झाला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाऊस झाला. दरम्यान, आज सकाळपासून देखील ढगाळ वातावरण आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे. तर जिल्ह्यातील सुमारे 1 हजार हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे.

कापलेली भात शेती पाण्याखाली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेती हा प्रमुख शेती व्यवसाय आहे. सध्या भात शेती पूर्णत: पिकून तयार झालेली असताना तिच्या कापणीचा हंगाम सुरू आहे. याचदरम्यान भात शेती कापण्यात येथील शेतकरी व्यस्त असताना पडणाऱ्या पावसामुळे कापलेले भात भिजून मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सुमारे 1 हजार हेक्‍टर क्षेत्रातील कापलेल्या भाताचे पावसाच्या पाण्यात भिजून नुकसान झाल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे.

सलग चार दिवस पडत आहे अवकाळी पाऊस

जिल्ह्यात सध्या अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. सोमवारी रात्री वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील काही गावांना अवकाळीने झोडपले होते. दरम्यान, शनिवार सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अधूनमधून वारादेखील सुटला होता. मंगळवारी सकाळी काही भागात हलका पाऊस झाला. परंतु गेले 4 दिवस सायकांळी तीन, चार वाजल्यानंतर विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात होते. सावंतवाडी तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. शहरासह तालुक्यातील काही गावांना पावसाने चांगलेच झोडपून काढले.

हापूसच्या मोहोरावर परिणाम

सावंतवाडीप्रमाणे दोडामार्ग, कणकवली, वेंगुर्ला तालुक्यातील अनेक गावांना अवकाळीचा तडाखा बसला. विजांच्या लखलखाटामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण होते. या शिवाय कुडाळ, मालवण, वैभववाडी तालुक्यात पाऊस झाला. देवगड तालुक्याच्या काही भागात हलका पाऊस झाला. अनेक भागात विजांचा लखलखाट सुरू होता. त्यामुळे काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. देवगडमध्ये सध्या हापूस मोहरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर अवकाळी पावसाचे संकट बागायतदारांना झोप उडवणारे ठरले आहे. हापूस मोहरत असताना ढगाळ वातावरण आणि पावसाचा परिणाम या मोहरावर होत असून आंबा पिकावर त्याचा मोठा परिणाम होणार असल्याची माहिती बागायतदारांनी दिली आहे.

बागायती पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव

सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांची धास्ती वाढली आहे. सध्या आंबा आणि काजू फळपिकांना पालवी आणि मोहोर येण्याची प्रकिया सुरू आहे. त्यातच पाऊस पडत आहे. त्यामुळे या पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अवकाळी पावसामुळे काही भागातील नाचणी पिकाचेदेखील नुकसान झाले. सततच्या ढगाळ वातावरणामुळे देवगड व वेंगुर्लेमधील हापूस बागायती आणि कणकवली सावंतवाडी कुडाळमधील काजू बागायती नवरे कीड रोगाचा आणि किटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. वातावरणातील हा बदल पिकावर परिणामकारक ठरेल, असा इशारा कणकवलीतील कृषीतज्ज्ञ शिवाजी खरात यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details