महाराष्ट्र

maharashtra

विधानसभा निवडणूक 2023 ; पाच राज्यातील निवडणुकांबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडं लोकांचा कल असल्याचं केलं स्पष्ट

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2023, 9:48 AM IST

Supriya Sule On Assembly Elections : सध्या पाच राज्यात होत असलेल्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या बाजूनं लोकांचा कल असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

supriya sule
खासदार सुप्रिया सुळे

बारामती Supriya Sule On Assembly Elections :मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून येत्या रविवारी म्हणजेच 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूनं लागेल, याविषयी तर्क-वितर्क काढले जात असताना, आता या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकांचा कल काँग्रेसकडं असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे :खासदार सुप्रिया सुळे गुरुवारी (30 नोव्हेंबर) बारामती दौऱ्यावर होत्या. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना त्या म्हणाल्या की, पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या बाजुनं लोकांचा कल असल्याचं स्पष्ट दिसतंय. तसंच या राज्यातील लोक हुकूमशाही, महागाई, बेरोजगारी यांच्या विरोधात मतदान करत आहेत. या निवडणुकांमध्ये काँग्रेस पुढं असल्याचं दिसून येतय. काँग्रेसनं जनतेला महागाई, बेरोजगारीच्या विरोधात लढू असं आश्वासन दिलंय आणि यावर जनतेनंही विश्वास टाकलाय.


मंत्रीपदाच्या ऑफरवरही केलं भाष्य :सुप्रिया सुळे यांना मंत्रीपदाच्या ऑफर संदर्भात विचारण्यात आलं असता, त्या म्हणाल्या की, माझ्या आईनं माझ्यावर संस्कार केले आहेत. मी एक महिला आहे, त्यामुळं सगळ्याच गोष्टी बोलल्या पाहिजेत, असा आग्रह कशासाठी? महिलांना काही गोष्टी पोटात ठेवण्याची सवय असते. याला मराठीत बाईपणा म्हणतात. हे संस्कार मला आईकडून मिळाले आहेत, असंही त्या म्हणाल्या.

प्रकाश आंबेडकर-नारायण राणे वादावरही दिली प्रतिक्रिया :वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दंगलीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रकाश आंबेडकरांना अटक करा, अशी मागणी केली. या प्रकरणाबाबत विचारण्यात आलं असता, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राणे हे या देशाचे मोठे नेते आहेत. शिवाय राज्यात आणि देशातही ते सत्तेवर आहेत. त्यामुळं ते जे काही बोलले असतील, ते कॅबिनेटमध्ये बोलतील किंवा त्यांच्या गृहमंत्र्यांना सांगतील, असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा -

  1. राज्यातील परिस्थिती हाताळण्यास देवेंद्र फडणवीस अपयशी; सुप्रिया सुळेंचा घणाघात
  2. छगन भुजबळांनी मंत्रिमंडळ बैठकीत बोलावं, 'खोके' सरकारमध्ये स्पष्टता नाही - सुप्रिया सुळे
  3. यशवंतरावांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे शनिवारी प्रीतिसंगमावर; अजित पवार, सुप्रिया सुळेही येणार

ABOUT THE AUTHOR

...view details