महाराष्ट्र

maharashtra

Terror Activity in Pune : शांत, संयमी पुणे शहरात का रचले जाते देशविरोधी कृत्य?

By

Published : Jul 30, 2023, 5:41 PM IST

विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी तसेच शांत आणि पेन्शनरी लोकांचे शहर अशी पुणे शहराची ओळख आहे. मात्र, असे असले तरी मागील काही वर्षांपासून पुणे शहरात गुन्हेगारी वाढत आहे. तर देशविरोधी कृत्याच्या घटनांमध्ये (Terror Activity in Pune) देखील वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी 'अल सफा' या दहशतवादी संघटनेच्या 4 जणांना अटक केली आहे. शांत संयमी असलेल्या पुणे शहरात अशा या घटनांमध्ये का वाढ होत आहे पाहूया...

Terrorist Act In Pune
पुणे

पुणे शहरातील दहशतवादी कृत्याविषयी स्पष्टीकरण देताना एटीएसचे माजी अधिकारी

पुणे: एटीएसचे माजी अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले की, 1980 च्या दशकाच्या आधी पुण्याची (Terror Activity in Pune) ओळख ही पेन्शनरी लोकांचे शहर अशी होती; पण त्यानंतर याच पुण्याची ओळख ही सांस्कृतिक तसेच विद्येचे माहेरघर म्हणून झाली आणि त्यानंतर आयटी हब म्हणून याची ख्याती झाली. पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील विविध राज्यातून येणारे लोक तसेच विदेशातून येणारे लोक देखील जास्त आहेत. पुण्यात मेजर ब्लास्ट हा 2010 मध्ये जर्मन बेकरीचा झाला आणि याच 2010 नंतर अशा घटनांची यात वाढ झाली.

देशातील दहशतवादी घटनांशी पुण्याचे कनेक्शन:एटीएसचे माजी अधिकारी भानुप्रताप बर्गे पुढे म्हणाले की, 2010 नंतर जेव्हा बॉम्ब ब्लास्टची घटना घडली त्यानंतर 2012 मध्ये जंगली महाराज आणि मग 2014 फरासखाना येथे बॉम्ब ब्लास्ट घडविण्यात आले. यानंतर देशातील छोट्या ना मोठ्या घटनेत पुण्याचे कनेक्शन निघू लागले. विशेष म्हणजे, ज्या ज्या संघटनेच्या माध्यमातून हे कृत्य घडविले गेले त्याची एकूणच माहिती घेतली तर फक्त संघटनेचे नाव बदलले गेले; परंतु काम तेच असत. अनेक संघटनेवर बंदी आणूनही नवीन संघटना तयार करून या दहशतवादी लोकांकडून अशी कृत्य केली जात आहे, असे देखील यावेळी बर्गे यांनी सांगितले.


धार्मिक युवक अतिरेक्यांच्या टार्गेटवर:अतिरेकी संघटना सहसा युवकांना टार्गेट करतात. जे तरुण-तरुणी उच्च शिक्षित आहेत आणि ज्यांना धर्माची आवड आहे, अशा लोकांना हे लोक टार्गेट करतात. मग त्यांना त्या धर्माविषयी ज्ञान देऊन त्यांची माथी भडकविली जाते आणि त्यांच्याकडून विघातकी कृत्ये घडविली जातात. आपण जर काही दिवसांपूर्वीची पुण्यातील घटना बघितली तर त्यात जे 'अल सफा' संघटनेचे लोक पकडले गेले आहेत, त्यांचे वय देखील असेच 26 वर्षांच्या आत आहे. दहशतवाद्यांचा केवळ दहशत माजवायची असते आणि त्यांना जगात हा संदेश द्यायचा असतो की, आम्ही एका ठराविक धर्माच्या विरोधात अशा कारवाया करत आहे, असे देखील यावेळी बर्गे म्हणाले.

तो दहशतवादी मेकॅनिकल इंजिनियर:कोथरूडमध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याच्या साथीदारास राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आणखी एकाला रत्नागिरी परिसरातून अटक केली. सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७ वर्षे, रा. कौसर बाग, रत्नागिरी) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता ५ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सिमाब काझी हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील पंढरी गावाचा आहे. तो मेकॅनिकल इंजिनियर आहे. तो एका नामांकित कंपनीत कामाला असून त्याला १५ लाख रुपयांचे पॅकेज आहे. तो कोंढवा भागात राहायला आहे. दरम्यान सहायक पोलीस आयुक्त अरुण वायकर यांनी न्यायालयात सांगितले की, सिमाब काझी याने अब्दुल पठाण याच्या बँक खात्यावर पैसे पाठविले. ते पैसे पुढे मोहम्मद खान आणि मोहम्मद साकी यांना टेरर फंडिंगसाठी दिले गेले. सिमाबने किती पैसे दिले आहेत, अजून त्याला कोणी मदत केली आहे का? याचा तपास केला जात आहे. विशेष सरकारी वकील विजय फरगडे तसेच तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त अरुण वायकर यांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली तर आरोपींच्या वतीने ऍड यशपाल पुरोहित यांनी काम पाहिले.


आंबोलीच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी:दहशतवाद्यांनी स्फोटाची चाचणी घेतलेल्या जंगलातील ठिकाणाची पुणे एटीएसच्या पथकाने नुकतीच पाहणी केली आहे. पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची एटीएसकडून चौकशी सुरू आहे. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांनी आंबोलीच्या गर्द जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केली होती. त्यासाठी हे दहशतवादी तब्बल चार दिवस आंबोलीच्या जंगलात वास्तव्यास होते. पुणे 'एटीएस'च्या पथकाने मंगळवारी आंबोलीच्या जंगलात येऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्या ठिकाणी काही महत्त्वाचे धागेदोरे या पथकाच्या हाती लागले.


'एटीएस'ची गुप्त कारवाई:मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी व मोहम्मद आलम हे तिघेही बॉम्बस्फोटाच्या चाचणीसाठी पुण्यातून आंबोलीत आले होते. पुणे ते कोल्हापूर-निपाणी-आजरामार्गे आंबोली असा त्यांनी प्रवास केला. या प्रवासादरम्यान ते काही दिवस निपाणी व संकेश्वर येथे वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या कारवाईबाबत 'एटीएस'च्या अधिकाऱ्यांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे. ज्या ठिकाणी बॉम्बस्फोटाची चाचणी करण्यात आली, त्या जागेवरील माती परीक्षणासाठी पथकाने घेतली. दरम्यान, त्या ठिकाणी अन्य काही साहित्य या पथकाला मिळाल्याचे समजते. गुरुवारी पुणे 'एटीएस'ने अब्दुल कादीर दस्तगीर पठाण या संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय 'एटीएस'च्या अधिकाऱ्यांना आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details