मुंबई : नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनानिमित्त भावनिक पत्र लिहिल आहे. बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त आपण प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून ऐकले. हे वृत्त ऐकताच आपल्या मनात भावनांचा कल्लोळ माजला होता. एका क्षणार्धात बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आपण घालवलेला सर्ववेळ आपल्या डोळ्यासमोरून जात होता, असे या पत्रातून त्यांनी बाळासाहेबांची आठवण काढली आहे. आज सोमवार (दि. 23 जानेवारी)रोजी बाळासाहेबांची जयंती सर्वत्र साजरी होत आहे. सर्वच राजकीय पक्ष बाळासाहेबांना अभिवादन करत आहेत.
आठवणी कधीही न संपणाऱ्या आहेत : बाळासाहेब ठाकरे हे कधीही राजकीय व्यक्तिमत्व नव्हते. म्हणूनच ते सर्व क्षेत्रातील लोकांना आपलेसे वाटायचे. त्यांची काम करण्याची पद्धत अत्यंत भिन्न होती. ते पक्के राजकारणी कधीच नव्हते. त्यांनी आयुष्यभर आपल्या कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार केला. म्हणूनच फक्त राज्यातून नाहीतर देशभरातून लोक त्यांच्याकडे आकर्षित होत होते. आपल्या माणसांची बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून नेहमीच काळजी घेतली जात होती. वेळोवेळी आपल्या माणसांची ते विचारपूस करायचे अशी आठवण नारायण राणे यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे. आपल्या बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आपल्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा खूप विश्वास होता. आपल्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत बाळासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद आणि विरोधी पक्ष नेतेपद केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आपल्याला मिळाले. आपल्या आतापर्यंतच्या 39 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत बाळासाहेबांनी दिलेले प्रेम आणि आठवणी कधीही न संपणाऱ्या आहेत, याची कबुली पुन्हा एकदा पत्रातून नारायण राणे यांनी दिली आहे.