महाराष्ट्र

maharashtra

भंडारा जिल्ह्यात 79 टक्के रोवण्या रखडल्या

By

Published : Jul 19, 2021, 9:39 PM IST

Updated : Jul 19, 2021, 10:41 PM IST

bhandara

भंडारा जिल्ह्यात सरासरीएवढा पाऊस येऊनही 79 टक्के रोवण्या रखडल्या आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचे परे 21 दिवसांच्या वर झाल्याने उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांचे परे हे पिवळे पडलेले आहेत. त्यामुळे शेतकरी दररोज आकाशाकडे डोळे लावून पावसाची आतूरतेने वाट पाहत आहेत.

भंडारा - जिल्ह्यात 18 जुलैपर्यंत सरासरी पाऊस झाल्यावरही जिल्ह्यातील केवळ 21 टक्के धानाची रोवणी झालेली आहे. पुढच्या आठ दिवसात रोवणीयोग्य पाऊस बरसला नाही तर पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकर्‍यांना बसणार आहे. जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस न पडल्याने रोवण्या रखडलेल्या आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचे परे 21 दिवसाच्या वर झाल्याने उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांचे परे हे पिवळे पडलेले आहेत. त्यामुळे शेतकरी दररोज आकाशाकडे डोळे लावून ईश्वराची एकच प्रार्थना करतोय, की शक्य तेवढ्या लवकर पाऊस येऊ दे.

भंडारा जिल्ह्यात 79 टक्के रोवण्या रखडल्या

1 लाख 81 हेक्टरवर होणार लागवड

धान्याचा कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात 2021 मध्ये खरिपातील 1 लाख 81 हजार हेक्‍टरवर लागवड होणार आहे. मात्र जुलैमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने 18 जुलैपर्यंत केवळ 21 टक्के रोवण्या पूर्ण झालेल्या आहेत. यावर्षी अपेक्षेनुसार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. जूनमध्ये पावसाने व्यवस्थित हजेरी लावली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतात परेही टाकले. पण, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

पुढच्या आठ दिवसात पाऊस न बरसल्यास परे धोक्यात

जून महिन्यात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पऱ्यांची योग्य ती वाढ झालेली आहे. भंडारा जिल्ह्यात 7 ऑगस्टपर्यंत रोवण्या केल्या जातात. त्यामुळे आजघडीला शेतातील पर्‍यांना धोका नसला तरी येत्या आठ-दहा दिवसात पाऊस बरसला नाही, तर हे परे धोक्यात येतील. एवढेच नाही तर ज्या पऱ्यांचे आयुष्यमान 21 दिवसांच्या वर झाले आहे. त्यापासून मिळणाऱ्या उत्पादनात पंधरा टक्‍क्‍यांनी घट होईल, असा अंदाज कृषी अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

सरासरीएवढा पाऊस येऊनही 21 टक्केच रोवणी का?

जून महिन्यात पाऊस अपेक्षापेक्षा चांगला बरसला आहे. जून महिन्यात 138.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जून आणि जुलै 18 पर्यंत 102 टक्के पाऊस झाला. मात्र जुलै महिन्यात आतापर्यंत केवळ 72 टक्के पाऊस आणि तोही अधूनमधून बरसल्याने रोवणीयोग्य पाणी शेतात जमा न झाल्याने या रोवण्या रखडलेल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या पावसाकडे नजरा

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, यावर्षी सरासरीपेक्षा चांगला पाऊस बरसेल अशी अपेक्षा होती. त्यामुळे शेतकरी आनंदी होता. मात्र, निसर्गाने पुन्हा धोका दिला. जुलै महिन्यात पाऊस बरसला नाही आणि शेतात उभे असलेले परे करपायला सुरुवात झाली. काही शेतकऱ्यांनी दूरवरून नाल्याचे पाणी मिळवत रोवण्या पूर्ण केल्या. मात्र, 10 एकरासाठी त्यांना 30 हजार रुपयांपेक्षा अधिकचा खर्च आला. बऱ्याच शेतकऱ्यांचे परे आता 21 दिवसांच्या वर झालेले आहेत. मात्र, केवळ निसर्गावर अवलंबून असलेले हे शेतकरी हतबल होऊन पावसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांनी खेळलेला शेतीचा हा जुगार यावर्षी त्यांना नफा देतो की नुकसान करतो? हे आता निसर्गावर अवलंबून आहे.

हेही वाचा -ASHADHI WARI 2021: "बा पांडुरंगा, शेतशिवारात समृद्धी येऊ दे, कोरोनाचे संकट दूर कर" उपमुख्यमंत्र्यांनी घातले साकडे

Last Updated :Jul 19, 2021, 10:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details