बीड - सायंकाळी शेतातून घराकडे माजलगाव बॅक वॉटरच्या पाण्यातून बोटीमध्ये बसून येत असताना तिघेजण बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. पाण्यात बुडालेल्या सुशीला भारत फरताडे (वय 24), अर्णव भारत फरताडे (वय 6) व पूजा काळे (वय 6) या तिघांचेही मृतदेह चोवीस तासाच्या शोधमोहिमेनंतर शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांना सापडले. विशेष म्हणजे, एवढी मोठी घटना घडून देखील बुडालेले मृतदेह शोधण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाची कुठलीही यंत्रणा खळवट निमगावमध्ये आली नाही. हे विदारक वास्तव आहे. शेवटी येथील नागरिकांनी माजलगाव येथील भोई समाजाच्या एका खासगी होडीला पाचारण करून बुडालेले तिघांचेही मृतदेह शोधून काढले.
नऊ वर्षापासून नादुरुस्त पुलांमुळे अनेकांनी गमावला जीव जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील खळवट निमगावच्या पश्चिमेकडील ग्रामस्थांना आपल्या शेतात जाण्यासाठी नऊ वर्षांपासून दुरुस्त न झाल्यामुळे वाटेत असलेला माजलगाव बॅक वॉटर पाण्यातून बोटीमध्ये बसून जावे लागते. हा एक किलोमीटर पाण्यातून प्रवास करताना आतापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र, याचा इथल्या प्रशासनावर कसलाच परिणाम झालेला नसल्याचे येथील सरपंच भारत निसर्गण यांच्यासह ग्रामस्थांनी सांगितले.
पुलाच्या दुरुस्तीचे काम रखडलेले -
खळवट निमगावच्या पश्चिमेला 2012मध्ये एक पूल बनवण्यात आला होता. मात्र, दोन वर्षातच या पुलाची पडझड झाली. त्यानंतर सातत्याने येथील ग्रामस्थांनी संबंधित माजलगावचे उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह सहा आमदारांकडे पाठपुरावा केला. मात्र, नऊ वर्षांत साधा पूल देखील खळवट निमगावच्या ग्रामस्थांना मिळाला नाही. याचा परिणाम 2012 नंतर गावातील अनेकांचा शेतात जाताना किंवा येताना बुडून मृत्यू झाला आहे. हे सांगताना येथील ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आले. मात्र, गेंड्याची कातडी पांघरून बसलेल्या प्रशासनाला याचं काहीच देणंघेणं नाही, असा आरोप येथील ग्रामस्थसह ग्रामपंचायत सदस्य रमेश चव्हाण यांनी केला.
प्रशासनातील जबाबदार अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा -
केवळ शेतात जाणाऱ्या पुलाची वाताहत झाल्यामुळे आमच्या गावातील अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. 2012 नंतर आठ ते दहा लोकांचा या माजलगाव बॅक वॉटरमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. आम्ही वारंवार पुलाच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करूनदेखील पूल दुरुस्त होत नाही. आता आम्ही प्रशासनासमोर हात टेकले आहेत. हा पूल दुरुस्त न करणाऱ्या संबंधित प्रशासनातील अधिकारी व ठेकेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी खळवट निमगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.
हेही वाचा -बीडमध्ये चप्पू उलटल्याने तिघे बुडाले; माय-लेकराचा समावेश