बीड - शेतातील कामावरून घराकडे चप्पूवर बसून येत असताना तिघे बुडाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील खळवट निमगाव येथे गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेत माय लेकराचा समावेश आहे. बुडालेल्यांचा शोध घेणे सुरू असल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. सुशीला भारत फरताडे (वय 24), अर्णव भारत फरताडे (वय 6 वर्ष) व पूजा काळे वय (6 वर्ष सर्व राहणार खळवट निमगाव तालुका वडवणी) असे बुडालेल्यांची नावे आहेत.
या घटनेची सूत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी, की वडवणी तालुक्यातील खळवट निमगावच्या पश्चिमेला माजलगाव बॅक वॉटर (धरण) आहे. ज्या शेतकऱ्यांची शेती खळवट लिमगाव गावच्या पश्चिमेला आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना एक किलोमीटर अंतर चप्पूवर बसून पाण्यातून जावे लागते. मागील अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. दररोज शंभर ते सव्वाशे लोक त्याच चप्पूवरून आपल्या शेतात जा-ये करतात. गुरुवारी असेच भारत राजाभाऊ फरताळे व त्यांचे कुटुंबीय शेतातील काम करून सायंकाळी खळवट निमगावकडे येत असताना अचानक हवा सुटली व चप्पु मध्य भागातच पलटला. याच्यामध्ये एकूण पाच जण बसलेले होते. यामध्ये भारत राजाभाऊ फरताडे व त्यांच्या सासू अनतिका नाईकवाडे यांना पोहता येत होते. त्यामुळे त्यांनी पोहत जाऊन आपला जीव वाचला. मात्र, या घटनेत सुशीला फरताडे, अर्णव फरताडे व पूजा काळे हे तिघे बुडाले. पुजा काळे ही सहा वर्षाची मुलगी भारत फरताडे यांची भाची होती, अशी माहिती खळवट निमगाव येथील ग्रामस्थ जगदीश फरताळे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
बुडालेल्यांचा शोध घेणे सुरूच -
या घटनेत बुडालेल्या आलेल्या तिघा जणांचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होत. मात्र, हाती काहीच लागले नाही. त्यामुळे उद्या सकाळी म्हणजे शुक्रवारी सकाळी पुन्हा ही शोधमोहीम सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे.