अमरावती- दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाळा लवकर सुरू झाला. त्यामुळे, शेतकऱ्यांची पिके बहरली होती. मात्र, परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक हिसकावून नेले. एकट्या पश्चिम विदर्भातील केवळ ५ जिल्ह्यांमधील १ लाख ३० हजार हेक्टरवरील पिके ही पूर्णतः खराब झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीमधून समोर आले आहे. असे असले तरी यापेक्षाही जास्त नुकसान झाल्याची शक्यता कृषी तज्ञांनी व्यक्त केली आहे.
मागील दोन आठवड्यात पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे, काढनीला आलेल्या सोयाबीनच्या पिकाला कोंब फुटली आहेत. तसेच, अती पावसामुळे पिके खराब झाली असून, यंदा सोयाबीन पिकानेच शेतकऱ्यांचे तेल काढले आहे. यवतमाळ जिल्ह्यात कपाशी पिकाचे सर्वाधिक उत्पन्न घेतल्या जाते. मात्र, यावर्षी परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. जास्त पाण्याने कपाशीचे बोंडे पूर्णत: सडले आहे. यंदा कोरोनामुळे कपाशीला भाव नव्हता. त्यामुळे, शेतकऱ्यांनी कमी दराने व्यापाऱ्यांना कापूस विकला. यंदा तरी कापूस उत्पादनातून दोन पैसे मिळतील अशी शेतकऱ्यांना आशा होती, मात्र ती ही मावळली.