महाराष्ट्र

maharashtra

IPL 2021 : राजस्थानचा 'रॉयल' विजय, ऋतुराज गायकवाडचे शतक व्यर्थ

By

Published : Oct 2, 2021, 11:43 PM IST

ऋतुराज गायकवाडचे शतक व्यर्थ
ऋतुराज गायकवाडचे शतक व्यर्थ

चेन्नईने राजस्थानसमोर विजयासाठी १९० धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईने २० षटकात ४ गडी गमवून १८९ धावा केल्या. मात्र राजस्थानच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर सात गडी राखून राजस्थानने चेन्नईवर विजय मिळवला.

अबुधाबी- आयपीएल 2021 या सत्रात चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना रंगतदार ठरला. चेन्नईने उभारलेल्या धावांचा डोंगर पार करताना राजस्थानची दमछाक होईल असे वाटत होते. मात्र सांघिक कामगिरीच्या जोरावर राजस्थानने चेन्नईवर सहजम मात दिली. 190 धावांचे लक्ष्य राजस्थानने अवघ्या 17.3 षटकात सात गडी राखून गाठले. त्यामुळे सातव्या क्रमांकावर असलेल्या राजस्थान रॉयल्सने चेन्नईला नमवल्याने चौथ्या क्रमाकांसाठी झगडणाऱ्या संघांची चिंता वाढवली आहे. विशेष म्हणजे मुंबईचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे.

चेन्नईने सामन्याची सुरुवात दमदार केली. पहिल्या गड्यासाठी ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसिसने ४७ धावांची भागीदारी केली. मात्र २५ वैयक्तिक धावसंख्येवर असताना फाफन राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर स्टम्पिंग झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला सुरेश रैनाही मैदानात जास्त वेळ तग धरू शकला नाही. ३ धावा करून राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या गड्यासाठी ऋतुराज आणि मोइन अलीने चांगली भागीदारी केली. संघाच्या ११४ धावा असताना मोइन अली बाद झाला. राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर संजू सॅमसननं त्याला स्टम्पिंग केले. त्यानंतर अंबाती रायडू मैदानावर जास्त वेळ तग धरू शकला नाही. रायडू चेतन साकारियाच्या गोलंदाजीवर २ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाडने अर्धशतकी भागीदारी केली. शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत ऋतुराजनं आपलं शतक साजरे केले. त्याने ६० चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १०१ धावा केल्या.

चेन्नईने राजस्थानसमोर विजयासाठी १९० धावांचं आव्हान दिले होते. हे आव्हान गाठण्यासाठी राजस्थाननं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी केली. एविन लेवीस आणि यशस्वी जैस्वाल या जोडीनं पहिल्या गड्यासाठी ७७ धावांची भागीदारी केली. यात यशस्वी जैस्वालनं २१ चेंडूत ५० धावा केल्या. यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. हे जोडी जमली असताना एविन बाद झाला. त्याने १२ चेंडूत २७ धावा केल्या. त्यानंतर लगेचच यशस्वी बाद झाला. दोन गडी बाद झाल्यानंतरही संघावरील दडपण दूर करत संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी डाव सावरला आणि तिसऱ्या गड्यासाठी महत्त्वपूर्ण भागीदारी केली. विशेष म्हणजे मुंबईकर यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे या दोघांनी अर्धशतकं ठोकली.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन -

चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंह धोनी (कप्तान आणि यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, अंबाती रायुडू, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकूर, केएम आसिफ, जोश हेझलवूड.

राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन (कप्तान आणि यष्टीरक्षक), एविन लुईस, यशस्वी जयस्वाल, डेविड मिलर, शिवम दुबे, आकाश सिंह, राहुल तेवतिया, ग्लेन फिलिप्स, चेतन साकारिया, मयंक मार्कंडे, मुस्तफिजुर रहमान.

ABOUT THE AUTHOR

...view details