महाराष्ट्र

maharashtra

Karsan Ghavri : 'या' दोन संघात होणार विश्वचषकाचा अंतिम सामना, 'ईटीव्ही भारत'शी बोलताना माजी गोलंदाज करसन घावरी यांनी केलं भाकीत

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 4:31 PM IST

Updated : Nov 15, 2023, 4:51 PM IST

Karsan Ghavri : सध्या भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारताचे माजी वेगवान गोलंदाज करसन घावरी यांनी 'ईटीव्ही भारत' शी खास बातचीत केली. यावेळी बोलताना त्यांनी कोणते दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील आणि कोणता संघ विजयी ठरेल, याचं उत्तर दिलं.

Karsan Ghavri
Karsan Ghavri

पाहा विशेष मुलाखत

मुंबई : भारतात सुरू असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं आतापर्यंत सर्वच साखळी सामने जिंकत उपांत्य फेरीत धडाक्यात प्रवेश केला. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ उपांत्य फेरीसह अंतिम फेरीही जिंकेल, असा विश्वास भारताचे माजी गोलंदाज करसन घावरी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.

घरच्या परिस्थितीचा फायदा मिळेल : १९७५ आणि १९७९ च्या विश्वचषकात आपल्या भेदक गोलंदाजीनं प्रतिस्पर्धी संघाला धडकी भरवणारे करसन घावरी म्हणाले की, "ज्या प्रकारे भारतानं विश्वचषकात सलग ९ साखळी सामने जिंकलेत, त्यामुळे टीमचं मनोबल वाढलं आहे. त्यासोबत हा विश्वचषक भारतात होत असल्यामुळे, घरच्या परिस्थितीचा फायदाही भारतीय संघाला मिळेल", असं त्यांनी सांगितलं.

भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना होणार : पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत असून, दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. "भारत न्यूझीलंडला पराभूत करेल, तर ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवेल", असा अंदाज घावरी यांनी व्यक्त केला. "अशाप्रकारे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना होईल आणि त्यात भारतीय संघ विजयी ठरेल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतानं क्षेत्ररक्षणात भरपूर सुधारणा केली : "भारतीय फलंदाजांनी दोन मोठ्या भागिदारी करणं गरजेचं आहे. याशिवाय भारताची गोलंदाजीही भक्कम आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारताचे तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटू चांगल्या प्रकारे रोखू शकतात. त्यासोबतच या विश्वचषकात भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणातही भरपूर सुधारणा झाली आहे", असं करसन घावरी म्हणाले.

पॉवर हाऊस गोलंदाजी आहे : "भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली तर ते मोठी धावसंख्या उभारू शकतात. त्या धावसंख्येचा पाठलाग करताना प्रतिस्पर्ध्याला रोखण्यासाठी आपल्याकडे पॉवर हाऊस गोलंदाजी आहे", असं करसन घावारी यांनी नमूद केलं. "कर्णधार रोहित शर्मा याचा हा शेवटचा विश्वचषक असू शकतो. त्यामुळे सर्वच क्रिकेट चाहत्यांची इच्छा भारतानंच हा विश्वचषक जिंकावा अशी आहे", असं ते शेवटी म्हणाले.

हेही वाचा :

  1. Pravin Amre : श्रेयस अय्यर भविष्यात टीम इंडियाचं नेतृत्व करू शकतो का? कोच प्रवीण आमरे यांनी ETV Bharat ला दिलं उत्तर
  2. Cricket World Cup 2023 : टीम इंडियाच्या विश्वचषकातील दमदार कामगिरीमागचं रहस्य काय?
  3. Farokh Engineer : 'ही टीम चॅम्पियन आहे, विश्वचषकात अपयशी होणार नाही', दिग्गज क्रिकेटर फारूख इंजिनियर यांच्याशी ETV Bharat ची खास बातचीत
Last Updated : Nov 15, 2023, 4:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details