कोलकाता:हार्दिक पांड्याने त्याच्या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत चढ-उतार, दुखापती, शस्त्रक्रिया आणि वाद अनेक पाहिले आहेत. पण त्याने हसतमुखाने प्रत्येक गोष्टींचा सामना केल्याचे तो सांगतो. या सर्व गोष्टींना मागे टाकून, इंडियन प्रीमियर लीगमधील गुजरात टायटन्सच्या ( Gujarat Titans ) पहिल्या सत्रात तो केवळ अष्टपैलू म्हणून चमकला नाही, तर एक चांगला कर्णधार म्हणूनही उदयास आला आणि संघाला अंतिम फेरीत घेऊन गेला.
पहिल्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव केल्यानंतर तो आभासी पत्रकार परिषदेत म्हणाला, लोक तर बोलतच राहतील. त्यांचे हे कामचं आहे. त्याला मी काही करू शकत नाही. तो म्हणाला, हार्दिक पांड्याचं नाव नेहमीच विकलं जातं ( My name is always sold ) आणि मला त्याची कोणतीही अडचण नाही. मी हसतमुखाने त्याचा सामना करतो. मुंबई इंडियन्सच्या यशानंतर 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पांड्याला खूप आशा होत्या आणि त्याची तुलना विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांच्याशी करण्यात आली. त्यानंतर 2019 मध्ये कॉफी विथ करणमध्ये महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी बीसीसीआयच्या चौकशी समितीची माफी मागितली.
भारताकडून शेवटचा सामना नामिबियाविरुद्ध खेळला -
८ नोव्हेंबर रोजी दुबई येथे झालेल्या T20 विश्वचषकात त्याने भारताकडून शेवटचा सामना नामिबियाविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून कंबरेच्या ऑपरेशनमुळे तो गोलंदाजीत संघर्ष करताना दिसत होता. मुंबई इंडियन्समधून मुक्त झाल्यानंतर, गुजरातने त्याला आयपीएलच्या 15व्या हंगामाच्या मेगा लिलावापूर्वी 15 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याच्याकडे कर्णधारपद देण्यावरही प्रश्न उपस्थित झाले होते. पण त्याचा गुरू एमएस धोनीप्रमाणेच कॅप्टन कूल पांड्याने आपल्या कामगिरीने टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.