पुणे - ओशो यांचा जन्म व मृत्यचे स्थळ, समाधी भारतात आहे. त्यांनी सर्वाधिक काळ भारतात घालवला. मात्र, ओशोंची बौद्धिक संपदा, पुस्तके, ध्वनिफिती, दृकश्राव्य फिती, ट्रस्टची मालमत्ता या ( Osho Followers ) सर्वांचे मान्यता अधिकार मात्र पाश्चिमात्यांकडे आहेत. झुरीच येथे ओशो इंटरनॅशनलचे मुख्यालय ( Osho International Headquarters ) नेण्यात आले असून, सगळ्या गोष्टींचा लाभही तिथेच जात आहे. ओशोंचे विचार लोकांपर्यंत पोहचू न देता अनुयायींवरही अनेक बंधने लादण्यात येत आहेत. ओशोंच्या बौद्धिक संपदेवर हक्क सांगत त्या साहित्यातून मिळणारा संपूर्ण पैसा पाश्चिमात्यांकडेच जातो. भारतीय ओशो आश्रमांना विशेषतः पुण्यातील आश्रमाला ( Pune Ashram ) त्यातून काहीही उत्पन्न मिळत नाही. उलट ते येथील व्यवस्थापनावर आपले वर्चस्व दाखवत आहेत. आश्रमाच्या मालमत्ता विकण्याचा प्रयत्न होत आहे. हे सर्व ओशोंचे विचार संपविण्याचे षडयंत्र आहे,"असा आरोप ओशो अनुयायांच्या वतीने ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनचे माजी विश्वस्त व 'ओशो वर्ल्ड'चे संपादक स्वामी चैतन्य कीर्ती यांनी केला आहे.
आश्रमाच्या परिसरात जमावबंदी लागू -गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंच्या समाधीचे दर्शन मिळावे, म्हणून देशातील विविध ठिकाणाहून अनुयायी आश्रमात आले होते. मात्र, या आश्रमाच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. तसेच आश्रमात अनुयायांना प्रवेश नाकारला. त्यामुळे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील आश्रमाबाहेर अनुयायांच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. स्वामी चैतन्य कीर्ती यांच्यासह पटकथाकार व ओशो अनुयायी कमलेश पांडे, याचिकाकर्ते व माजी विश्वस्त स्वामी प्रेमगीतजी (योगेश ठक्कर), स्वामी मोक्षजी, स्वामी चेतनारूपजी आदी अनुयायी उपस्थित होते. त्यांनी गुरु पौर्णिमेनिमित्त ध्यान, भजन कीर्तन, प्रवचन, समाधी दर्शन अशा सोहळ्याचे आयोजन केले होते.