मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. दिवसागणिक एक- एक आमदार गुवाहाटीत जाऊन शिंदे गटात सामील होत आहेत. शिवसेनेकडील आमदारांवर संशयाच्या नजरा आहेत. परभणीचे आमदार राहुल पाटील ( Parbhani MLA Rahul Patil ) गुवाहाटीला गेल्याच्या चर्चा रंगली. अफवांवर विश्वास ठेवू नका, मी मतदार संघात आहे. तसेच मरेपर्यंत शिवसेना ( Shiv Sena ) सोडणार नाही, असे सांगत दिवसभराच्या चर्चेला आमदार राहुल पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. तब्बल 51 आमदारांना घेऊन शिंदे यांनी बंड केला आहे. शिवसेनेतील तयार 39 आमदारांचा समावेश आहे. शिंदे यांनी बंड केलं, तेव्हा त्यांच्यासोबत फक्त 13 आमदार होते. पण रोज एक- दोन आमदार जाऊन शिंदे यांना मिळत असल्याने त्यांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. सरकार टिकवण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या जोर- बैठका सुरू आहेत. तर दुसरीकडे कोणता आमदार कधी शिंदे गटात जाईल, याचा भरवसा राहिला नाही. प्रत्येक आमदारावर संशयाच्या फेऱ्यात आहे. साधा फोन लागला नाही, तरी शिंदे गटाच्या नावाने बोंबाबोंब सुरु होते.