महाराष्ट्र

maharashtra

Raj Thackeray : एक घाव दोन तुकडे करणाऱ्या राज ठाकरेंचा मात्र पुन्हा यूटर्न?

By

Published : Jun 3, 2022, 7:43 PM IST

Raj Thackeray

MNS Leader Raj Thackeray : 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भगवी शाल हातात घेतली. मात्र, एखाद्या भूमिकेवर कधी नव्हे ते स्पष्टीकरण देण्याची वेळ राज ठाकरेंवर आली आणि त्यासाठी त्यांनी ठाण्यात उत्तर सभा घेतली. दुसरा मुद्दा भोंग्यांचा. भोंगावाद तापलेला असताना राज ठाकरे यांनी जनतेसाठीच 3 पानी पत्र लिहिले. कालांतराने हे पत्र लोकं विसरली आणि पुन्हा एकदा याच मुद्द्यावर आणखी एक पत्र लिहिण्याची वेळ राज ठाकरेंवर आली. राज ठाकरे यांनी पुन्हा यूटर्न घेतलाय का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

मुंबई -खळखट्याक, एक घाव दोन तुकडे अशी ओळख असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर ( MNS Leader Raj Thackeray ) पहिल्यांदाच एकचं गोष्ट दोन दोन वेळा करण्याची वेळ आलेय. थोडक्यात पाहिले तर 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भगवी शाल हातात घेतली. मात्र, एखाद्या भूमिकेवर कधी नव्हे ते स्पष्टीकरण देण्याची वेळ राज ठाकरेंवर आली आणि त्यासाठी त्यांनी ठाण्यात उत्तर सभा घेतली. दुसरा मुद्दा भोंग्यांचा. भोंगावाद तापलेला असताना राज ठाकरे यांनी जनतेसाठीच 3 पानी पत्र लिहिले. कालांतराने हे पत्र लोकं विसरली आणि पुन्हा एकदा याच मुद्द्यावर आणखी एक पत्र लिहिण्याची वेळ राज ठाकरेंवर आली. राज ठाकरे यांनी पुन्हा यूटर्न घेतलाय का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

मनसेचा ग्राफ झपाट्याने वर झपाट्याने खाली -2006 साल राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि स्वबळावर राज्यात मनसेचे तेरा आमदार निवडून आणले. इतकेच नाही तर नाशिकमध्ये 40 नगरसेवक निवडून आणून पालिकेत सत्ता स्थापन केली. मात्र, राज ठाकरेंच्या हा यशाच्या ग्राफ जेवढ्या गतीने वर जात होता. तितकाच तो प्रविण दरेकर, शिशिर शिंदे आणि इतर कार्यकर्त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर खाली आला. त्याच काळात राज ठाकरे हे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे चाहते झाले. त्यांनी गुजरातचा दौरा केला आणि परतताना मोदींनी गुजरातमध्ये केलेल्या विकासाचे कौतुक केले आणि मोदींनी पंतप्रधान व्हावे, असे सांगितले.

'लाव रे तो व्हिडिओ' भूमिका बदलली -2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला त्यांनी मोदींबद्दलचे मत बदलले आणि त्यांच्या निवडणूक प्रचार भाषणात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांपेक्षा मोदींना अधिक लक्ष्य केले. गुजरातमध्ये गेल्यावर आपण संघटित दौऱ्यावर होतो आणि केवळ चांगल्या गोष्टी दाखवल्या गेल्याची कबुलीही त्यांनी जाहीर सभेत दिली. मोदी आणि महाराष्ट्र सरकारने केलेले खोटे दावे उघड करण्यासाठी त्यांनी जाहीर सभांमधील आकडेवारी आणि व्हिडिओ क्लिपचाही हवाला दिला. त्यांच्या सभा 'लाव रे तो व्हिडिओ' या टॅग लाईननने प्रसिद्ध झाल्या.

राज ठाकरे ED च्या निशाण्यावर -एवढे होऊनही मनसेला विधानसभेची एकच जागा मिळू शकली. नाशिक महापालिकेची सत्ता यापूर्वीच मनसेकडून भाजपच्या हातात गेली होती. 2019 साली राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपले राजकीय भविष्य पुन्हा मार्गावर आणण्यासाठी राज ठाकरे आणि मनसेचे प्रयत्न सुरू झाले. याच काळात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष यांच्यासह राज हेही दादरमधील कोहिनूर मिल जमीन खरेदीत ४२१ कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारासाठी ईडीच्या निशाण्यावर होते.

भूमिकेसोबत झेंडा देखील बदलला? - 2020 मध्ये राज यांनी मनसेचा झेंडा बदलला आणि त्यातील पूर्वीचे रंग काढून टाकले. नवीन ध्वज फक्त भगवा रंगाचा असून मध्यभागी तपकिरी रंगात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. आपला पक्ष हिंदुत्वावर भर देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. राज यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे पक्षाला पुनरुज्जीवित करण्याची एक उत्तम संधी म्हणून पाहिले. त्यांनी धोरणांमध्ये कठोर बदल केले. भाजप नेत्यांचे दुरावलेले संबंध पुन्हा एकदा सुधारण्यास सुरुवात केली. याच काळात भाजप नेते अशिष शेलार, चंद्रकांत पाटील, मंगल प्रभात लोधा, देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज ठाकरे व मनसे पदाधिकार्‍यांच्या भेटी ह्या होत राहिल्या.

या संदर्भात आम्ही ज्येष्ठ पत्रकार व संपादक रवींद्र आंबेकर यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की, "विविध नाविन्यपूर्ण प्रयोग केल्यानंतर आता हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्याशिवाय पक्षाचे पुनरूज्जीवन होणार नाही, हे बहुधा राज ठाकरे यांना समजून चुकले आहे. पक्षातील जे महत्वाचे कार्यकर्ते नेते आहेत त्यांचा पक्षविस्तारासाठी पुरेसा फायदा होताना दिसत नाही. मनसे हा एकखांबी तंबू आहे. अशावेळी आपल्या सर्व मर्यादा ओळखून राज ठाकरे यांना पॉप्युलर अजेंडा हाती घ्यावा लागला आहे. मात्र हिंदुत्वाच्या अजेंड्यावर भाजपा-शिवसेना यांसारखे पक्ष आधीच कब्जा करून बसल्यामुळे मनसेसाठी स्थिती बिकट असणार आहे. मनसे ही वोटकटुआ पार्टी बनून गेलीय. वोटकटुआ ते सत्ताधारी अशी मजल मारण्यासाठी मनसेला संघटनात्मक आणि संरचनात्मक बदल करावे लागतील. मात्र पक्ष तशा मूडमध्ये दिसत नाही."

दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदींतील लाऊडस्पीकर विरुद्धच्या पुढच्या लढ्याची घोषणा पत्राद्वारे केली. या पत्रात राज ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना त्यांनी पाठवलेले पत्र परिसरातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे. अशाच आशयाचे तीन पानी पत्र राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी लिहिले होते. त्या पत्रात देखील त्यांनी भोंग्याविरोधात जनआंदोलन उभारण्याचे आवाहन केले होते. मात्र, कालांतराने हे पत्र लोकांच्या विस्मरणात गेल. याच विषयावर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पत्र लिहिले आहे. त्यामुळे, या पत्राला लोकांचा काय प्रतिसाद मिळतो हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल.

हेही वाचा -राष्ट्रपती, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी कानपूरमध्ये दोन समाजात दगडफेक; तणावाचे वातावरण

ABOUT THE AUTHOR

...view details