महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Unlock : दिवाळीपूर्वी 'गोड' बातमी.. राज्यातील निर्बंध आणखी शिथील, उपाहारगृहे व दुकानांच्या वेळा वाढणार

By

Published : Oct 18, 2021, 7:20 PM IST

Updated : Oct 18, 2021, 8:59 PM IST

यंदाची दिवाळी बऱ्याच अंशी निर्बंधमुक्त साजरी करता येणार आहे. कारण कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्यामुळे राज्य सरकारनं निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कोरोना टास्कफोर्ससोबत बैठक झाली यावेळी हॉटेल आणि दुकानांची वेळ मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. 22 ऑक्टोबरपासून नवीन आदेश लागू होणार आहेत.

eases covid rules
eases covid rules

मुंबई - कोरोना रूग्णांची संख्या कमालीची घटल्याने राज्यातील निर्बंध अधिक शिथील केले जाणार आहेत. उपहारगृह, दुकानांच्या वेळा वाढवण्याबरोबरच अम्युझमेंट पार्कही २२ ऑक्टोबरपासून खुले करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी टास्क फोर्सची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असला तरी सर्वसामान्य नागरिकांच्या लोकल प्रवासावर निर्बंध कायम राहणार आहेत.


या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, संचालक डॉ दिलीप म्हैसेकर, मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, महापालिका उपायुक्त सुरेश काकाणी, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, शशांक जोशी, डॉ राहुल पंडित, डॉ खुसराव्ह, डॉ अजित देसाई, डॉ सुहास प्रभू आदी उपस्थित होते.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू होणार -

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर हळूहळू निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. येत्या २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू होणार आहेत. उपाहारगृहे आणि दुकानांच्या वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे तसेच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

हे ही वाचा -दोन वर्षानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावरून महाआघाडी अन् भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप !

लोकांनी बेसावध राहू नये -

दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे. लोकांनी बेसावध राहू नये, म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. येत्या 22 ऑक्टोबरपासून हे पार्क सुरू होतील. मात्र पार्कमधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले आहे. कोविड व्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून त्यांच्या उपचारांकडे देखील पुरेसे लक्ष द्यावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. कोरोनावर उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून येणाऱ्या नवीन औषधांच्या बाबतीतही त्यांची परिणामकारकता, किंमत, उपलब्धता याबाबत आत्तापासूनच माहिती घेत राहावी व संबंधितांच्या संपर्कात राहावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हे ही वाचा -शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; वाचा, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा

तिसऱ्या लाटेचा धोका कायम -

दुसरी लाट संथ झाली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की याबाबतीत लोकांनी बेसावध राहू नये म्ह्णून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी.

Last Updated :Oct 18, 2021, 8:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details