मुंबई -कोरोनाचा नवीन व्हेरियंट येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नवीन नियन व निर्बंध ( Maharashtra Govt issues fresh restrictions ) लागू केले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या सर्व प्रवाशांना केंद्र सरकारच्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक ( RTPCR test for Maharashtra Journey ) असणार आहे.
कोरोनाच्या काळात टॅक्सी, खासगी चारचाकीमधून प्रवास करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशाला 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तर चालक, वाहक व हेल्परला 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. ट्रान्सपोर्ट एजन्सीला 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
हेही वाचा-Hingoli : हिंगोलीत आता कोरोना लस घेणाऱ्यालाच मिळणार पेट्रोल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कोरोनाच्या काळात काय असणार नवी नियमावली? -
- आंतरराष्ट्रीय ठिकाणांवरून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना भारत सरकारच्या सर्व निर्देशांचे पालन करावे लागणार आहे.
- देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशाला कोरोनाचे दोन्ही डोस बंधनकारक असणार आहेत. दोन्ही डोस असतील तर 72 तासांपर्यंत वैध असलेली आरटी-पीसीआरचे प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे.
- कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच एसटी, बस, रेल्वे अशा सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करता येणार आहे. कोणत्याही दुकानात, मॉलमध्ये, कार्यक्रमात जाण्यासाठी कोरोना लशींचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. संपूर्ण लसीकरण झाले नसेल तर त्यांना कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही.
- महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा कोव्हिड अॅप, वेबसाईटवरून नागरिकांना कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र डाउनलोड करावे लागेल. हे कोविन प्रमाणपत्र दाखवून नागरिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.
- कार्यालय किंवा खासगी कार्यालयात काम करण्याची परवानगी मिळवण्यासाठी दोन्ही डोस घेणे बंधनकारक असणार आहे.
- 1000 पेक्षा जास्त लोकांचा जमाव झाल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना 500 रुपयांचा दंड तर जर कोणत्याही संस्थेने या नियमांचे पालन केले नाही तर त्यांना 50,000 दंड आकारला जाणार आहे.
- चित्रपटगृह, नाट्यगृह, विवाह समारंभाचे हॉल आदी ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाकरिता क्षमतेच्या फक्त 50 टक्के परवानगी मिळणार आहे..
- सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या खुल्या कार्यक्रमाला एकूण क्षमतेच्या केवळ 25 टक्के लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार आहे.