मुंबई - मशीदीवरील भोंगे न हटवल्यास मशीदीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना केले होते. राज ठाकरेंनी दिलेला अल्टीमेटम संपला असून आजपासून मनसे कार्यकर्ते राज्यभर भोंग्याविरोधात आंदोलन करत आहेत. हनुमान चालीसा प्रकरणावरुन कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, त्यामुळे राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.
काय आहे हनुमान चालीसा प्रकरण -मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबादेत सभा घेऊन मशीदीवर लावण्यात आलेले भोंगे काढण्याचे आवाहन केले होते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचेही त्यांनी बजावले होते. मात्र 3 तारखेनंतर भोंगे न हटवल्यास मनसे मशीदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा पठण करेल असा अल्टीमेटम राज ठाकरेंनी सरकारला दिला होता.