महाराष्ट्र

maharashtra

'सेंट्रल विस्टा' ही मोदी सरकारची संकटकाळातील प्राथमिकता कशी असू शकते? : सचिन सावंत

By

Published : Dec 10, 2020, 9:56 PM IST

देश सध्या प्रचंड मोठ्या आर्थिक गर्तेतून जात असताना दिल्लीत सेंट्रल विस्टा प्रकल्पाच्या माध्यमातून एकप्रकारे उधळपट्टीच केली जात आहे. सध्या या प्रकल्पाची आवश्यकता किती आहे? असा प्रश्न सचिन सावंत यांनी केला आहे.

sachin sawant
सचिन सावंत

मुंबई - देश सध्या प्रचंड मोठ्या आर्थिक गर्तेतून जात असताना दिल्लीत सेंट्रल विस्टा प्रकल्पाच्या माध्यमातून एकप्रकारे उधळपट्टीच केली जात आहे. सध्या या प्रकल्पाची आवश्यकता किती आहे? परंतु मोदी सरकारची प्राधान्यताच वेगळी आहे. त्यांना फक्त ईव्हेंटबाजी व दिखावा करण्यातच रस दिसतो. रोम जळत असताना भारतीय नीरो फीडल वाजवत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

मोदी सरकारवर जोरदार टीका -

यासंदर्भात ते म्हणाले की, मोदी सरकारची प्राथमिकता काय आहे, कोरोनाने अर्थव्यवस्था गाळात रुतली आहे. राज्य सरकारेच कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. राज्यांना महसूलाची गरज आहे. महाराष्ट्राचे उदाहरण द्यायचे झाले तर ३८ हजार कोटींचा जीएसटी परतावा अजून केंद्र सरकार देऊ शकले नाही. या देशातला शेतकरी आज आंदोलन करत आहे. विस्टा प्रकल्प आत्मनिर्भर अंतर्गत होणार आहे अशा वल्गना केल्या जात आहेत. १२ कोटी पेक्षा जास्त तरुणांचे रोजगार गेले आहेत. ते मोदी सरकारला प्रश्न विचारत आहेत, मोदीजी आम्हाला आत्मनिर्भर कधी करणार, गेलेले रोजगार कधी मिळणार, कामगार प्रश्न विचारत आहेत आम्हाला मदत कधी करणार? शेतकरी आपल्या हक्कासाठी लढत आहेत. पण त्याकडे त्यांचे लक्ष नाही, असे सावंत म्हणाले.

सहा वर्षात ईव्हेंटबाजीसारखे प्रकार

सहा वर्षात ईव्हेंटबाजीसारखे प्रकार करायचे, काशीमधले लेझर शो सारखे देखावे करायचे यातून तिथल्या लोकांना रोजगार मिळणार आहे का. मोदींजी आज सेंट्रल विस्टा दाखवत आहेत त्यातून रोजगार मिळणार आहे का यातून भूक भागणार आहे का? हा मोदींच्या कामकाजातील विरोधाभास आहे, असे सावंत म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details