महाराष्ट्र

maharashtra

MH Cabinet : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी रद्द; नैसर्गिक आपत्तीचे संकट असतानाही मंत्रिमंडळाचा पेच कायम

By

Published : Jul 28, 2022, 7:46 AM IST

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे व भाजप नेते देवेंद्र फडणवीस ( Shinde government ) यांनी सत्ता स्थापन केली. अनेक राजकीय डावपेचात शिंदे फडणवीस सरकारने शिवसेनेला धक्के दिले आहेत. असे असले तरी मंत्रीमंडळाच्या स्थापनेतील पेच सुटलेले नाहीत, असे चित्र आहे.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

मुंबई- राज्याला नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असताना दिल्लीतून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला अद्याप ग्रीन सिग्नल मिळत नसल्याने पेच अद्याप कायम आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनाही मंत्रिमंडळ विस्तारासाठी सातत्याने दिल्लीवारी करावी लागत आहे. बुधवारीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीला ( CM Eknath Shindes Delhi visit ) जाण्याचे नियोजन केले. मात्र, दिल्लीतून अचानक आलेल्या निरोपामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात ( Maharashtra cabinet expansion ) आला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार असल्याचे बोलले जाते.



सुरत, गुवाहाटी आणि गोवा राज्यातून पर्यटन करत राज्यात सत्तांतर झाले. शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Rebel leader Eknath Shinde ) यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे आतापर्यंत पाच दिल्ली दौरे झाले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असताना मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवरून विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यासह ( Ajit Pawar slammed gov ) अनेकांनी टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विरोधकांना प्रत्युत्तर दिले. सरकार स्थापन होऊन जवळपास महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेच मंत्रिमंडळ बैठक घेत असल्याने शिंदे सरकारवर टीकेचे बाण सुटले आहेत.



दिल्लीवारी रद्द-मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे सायंकाळी ७ वाजताच्या विमानाने दिल्लीला रवाना होणार होते. रात्री ९ वाजता महाराष्ट्र सदनात पोहोचणार होते. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील आज दिल्लीला जाणार होते. अचानक दिल्लीतून निरोप आल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द रद्द झाला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. मात्र, दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा कायम राहील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.



मुख्यमंत्र्यांनी असा केले दौरे-९ जुलैला मुख्यमंत्री पहिल्यांदा दिल्लीला गेले. राष्ट्रपती, जे पी नड्डा, राजनाथ सिंग आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यावेळी भेट घेतली होती. दुसऱ्यांदा ८ जुलैला त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तिसऱ्यांदा १८ जुलैला दिल्लीला रवाना झाले. १९ जुलैला दिल्लीत शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सहभागी झाले. यानंतर २२ जुलैला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंड यांच्या निरोप समारंभाला हजर राहण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. यानंतर 25 जुलैला नवीन राष्ट्रपती पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी ते दिल्लीला गेले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details