अमरावती : अमरावती ( Shocking incident in Amravati ) येथून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदगाव खंडेश्वर येथील छोरियानगरमध्ये ( Chhoriyanagar in Nandgaon Khandeshwar ) राहणाऱ्या नागरिकांना दूषित व गढूळ पाणी पिण्याची वेळ आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नांदगाव खंडेश्वर शहरातील छोरिया लेआउटच्या विहिरीमध्ये गढूळ पाणी जमा झाल्यामुळे विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा एकमेव असलेला स्रोत दूषित झाल्याने नाईलाजाने दूषित पाणी पिण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. ( Drinking Water is Contaminated )
स्थानिक नागरिक : छोरियानगरमध्ये अद्यापपर्यंत नगरपंचायतकडून होणाऱ्या पाणीपुरवठाची पाईपलाईन पोहचली नसल्याने येथील सर्व नागरिकांना या विहिरीवरून पाण्याचा पुरवठा होतो. या छोरियानगरमध्ये सांडपाणी किंवा पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता नाला नसल्यामुळे हे सर्व पाणी या विहिरीमध्ये गोळा झाले आहे. हे दूषित पाणी पिण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीकडे वारंवार नाल्यांची व पाणीपुरवठा पाइपलाइनची सुविधा पुरविण्याची मागणी करूनसुद्धा नगर पंचायतने या समस्येकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
दूषित पाण्याचे जिल्ह्यात ४ बळी :दूषित पाणी पिल्यामुळे मेळघाटातील पाचडोंगरी आणि कोयलारी येथील ३ जणांचा तर नया अकोल्याचा २२ वर्षीय एका तरुणाचा अतिसाराची लागण झाल्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच प्रशासनाने येथील नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.