महाराष्ट्र

maharashtra

LAKHMIPUR केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला अटक करा- राकेश टिकैतांचा योगी सरकारला आठवडाभराचा अल्टीमेटम

By

Published : Oct 6, 2021, 3:58 AM IST

Updated : Oct 6, 2021, 4:07 AM IST

लखीमपूरमधील हिंसाचाराच्या घटनेत मोहरिनिया गावातील रहिवाशी असलेल्या गुरविंदर सिंग यांचा मृत्यू झाला. या शेतकऱ्याच्या घरी राकेश टिकैत यांनी भेट दिली. या भेटीनंतर राकेश टिकैत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राकेश टिकैत योगी सरकार
राकेश टिकैत योगी सरकार

लखनौ - केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या मुलाला अटक करण्याकरिता भारतीय किसान युनियनचे नेता राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेश सरकारला आठवडाभराचा अल्टीमेटम दिला आहे. लखीमपूर खिरीमधील शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणातील आरोपपत्रात अजय कुमार मिश्राच्या मुलाचे नाव आलेले आहे.

लखीमपूरमधील हिंसाचाराच्या घटनेत मोहरिनिया गावातील रहिवाशी असलेल्या गुरविंदर सिंग यांचा मृत्यू झाला. या शेतकऱ्याच्या घरी राकेश टिकैत यांनी भेट दिली. या भेटीनंतर राकेश टिकैत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले, की केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक करण्यासाठी सरकारला आठवडाभराचा वेळ दिला आहे. आम्ही (शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर) तेराव्या दिवशी एकत्रित येणार आहोत. त्यावेळी एकत्रित येऊन भविष्याची रणनीती आखण्यात येणार आहे.

हेही वाचा-लखीमपूर खीरी हत्याकांड : पोलिसांनी ताब्यात घेताच प्रियांका गांधींचा दिसला "दुर्गावतार"

मंत्र्यांचा डिझेल चोरीतही सहभाग

पुढे टिकैत म्हणाले, की इंटरनेट सेवा पूर्ववत झाल्यानंतर आणखी व्हिडिओ समोर येणार आहेत. या आठवड्यात मंत्र्यांच्या मुलाला अटक करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. मंत्री आणि त्यांचा मुलगा गुन्हेगार असल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले आहे. त्यांचा डिझेल चोरीत सहभाग होता. त्यांचे नेपाळमध्ये तीन पेट्रोलपंप आहेत. तिथे डिझेल १५ ते २० रुपयांनी स्वस्त आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ मोनू याच्यावर लखीमपूर हिंसाचार घटनेचे आरोप आहेत.

हेही वाचा-lakhimpur Violence : संजय राऊत यांनी घेतली राहुल गांधींची भेट, म्हणाले विरोधकांनी एकत्र येण्याची गरज

रविवारी नेमकं काय घडल? -

रविवारी दुपारच्या सुमारास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य हे लखीमपूर खिरी येथे येणार होते. मात्र, त्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी हेलिपॅडला घेराव घातला. दरम्यान, केशव मौर्य हे आपला कार्यक्रम संपवून केंद्रीय राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा तेनी यांच्या घराकडे रवाना झाले. याची माहिती मिळताच अजय कुमार यांचा मुलगा घाईघाईत घरी जायला निघाला. त्याच्या गाडीचा ताफा तिकोनिया येथील बनबीरपुर चौकात पोहोचताच तेथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी न थांबवता ती थेट शेतकऱ्यांच्या अंगावर चढवण्यात आली. हा सर्व प्रकार जाणूनबूजून करण्यात आला, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

हा सर्व प्रकार घडल्यानंतर शेतकऱ्यांनी या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसेच कारमध्ये बसलेले भाजपा कार्यकर्ता आणि आशिष मिश्रा यांना घेरले. त्यानंतर आशिष मिश्रा यांनी परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळीबार केला. या गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचाही आरोप करण्यात येत आहे. तर या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, संपूर्ण देशभरातून या घटनेचा निषेध होत आहे.

हेही वाचा-राहुल गांधी आज लखीमपूरमध्ये पोहोचण्याची शक्यता

दुसरीकडे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर राहुल गांधी हे बुधवारी लखीमपूरला पोहोचणार आहेत.

Last Updated :Oct 6, 2021, 4:07 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details