महाराष्ट्र

maharashtra

कॉंग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेवर आसाममध्ये गुन्हा; भाजपाकडून यात्रा उधळण्याचा कट असल्याचा कॉंग्रेसचा आरोप

By ANI

Published : Jan 19, 2024, 1:44 PM IST

FIR on Bharat Jodo Nyay Yatra : आसाममध्ये कॉंग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावरुन चांगलंच राजकारण तापलंय. भापजाचा यात्रा उधळण्याचा कट असल्याचा आरोप कॉंग्रेसनं केलाय.

FIR on Bharat Jodo Nyay Yatra
FIR on Bharat Jodo Nyay Yatra

गुवाहाटी (आसाम) FIR on Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये पोहोचताच वादाला सुरुवात झालीय. राहुल गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर 'सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री' असल्याचा आरोप केलाय. तोच दुसरीकडं आसाम पोलिसांनी भारत जोडो न्याय यात्रेविरोधात एफआयआर दाखल केलाय. आसाम पोलिसांनी त्यांच्यावर प्रवासाचा मार्ग सोडून दुसरा मार्ग अवलंबल्याचा आरोप केलाय. यात्रा मार्गाचं उल्लंघन केल्याप्रकरणी भारत जोडो न्याय यात्रा आणि त्याचे आयोजक के. बी. बायजू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावर काँग्रेसनं आसाम सरकारवर हल्लाबोल करत यात्रा उधळल्याचा आरोप केलाय.

का दाखल झाला गुन्हा : गुरुवारी दुपारी भारत जोडो न्याय यात्रा जोरहाट शहरातून गेली तेव्हा यात्रेच्या आयोजकांनी नियोजित मार्गावरुन न जाता दुसरा मार्ग स्वीकारला, असं पोलिसांनी सांगितलंय. पोलिसांनी पुढं सांगितलं की, यात्रेच्या मार्गात अचानक बदल केल्यानं व्यत्यय निर्माण झाला. तसंच के बी बायजू आणि इतरांसह आयोजकांनी गर्दीला ट्रॅफिक बॅरिकेड्स तोडण्यासाठी आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी भडकवलं, असाही आरोप करण्यात येतोय.

यात्रा उधळण्याचा भाजपाचा प्रयत्न : काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याप्रकरणी आसामच्या भाजपा सरकारवर भारत जोडो यात्रा उधळल्याचा गंभीर आरोप केलाय. जयराम रमेश म्हणाले की, "आसामचं भाजपा सरकार 'भारत जोडो न्याय यात्रा' यशस्वी होऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी आमच्यासमोर अनेक अडथळे उभे केले गेले आहेत. परंतु आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, आसामचे तरुण, महिला आणि सर्व वर्गातील लोक 'भारत जोडो न्याय यात्रे'चा संदेश ऐकतील आणि पाठिंबा देतील."

25 जानेवारीपर्यंत यात्रा आसाममध्ये : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये 25 जानेवारीपर्यंत राहणार आहे. ही यात्रा या राज्यात 17 जिल्ह्यांतून 833 किमी अंतरावर चालणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा 14 जानेवारीला मणिपूर इथून सुरू झाली. ही यात्रा 20 मार्चला मुंबईत संपणार आहे. ही यात्रा 15 राज्यांतील 110 जिल्ह्यांत 67 दिवसांत 6,713 किलोमीटरचं अंतर कापणार आहे.

हेही वाचा :

  1. राहुल गांधी 'भारत जोडो यात्रे'च्या माध्यमातून मागणार 'न्याय', 15 राज्यांतून 6700 किलोमीटरचा होणार प्रवास
  2. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details