ETV Bharat / state

'वंचित'चा काँग्रेसला सात जागांवर पाठिंब्याचा प्रस्ताव, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षावरून विश्वास उडाला; आंबेडकरांचं खर्गेंना पत्र

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 19, 2024, 3:29 PM IST

Ambedkar Writes Letter to Kharge : महाविकास आघाडीत सामील झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला राज्यात सात जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव पत्राद्वारे दिला आहे. यावर काँग्रेसकडून कुठलाही अल्टिमेटम 'वंचित'ला देण्यात आला नसल्याचं वंचितनं स्पष्ट केलं आहे.

Ambedkar Writes Letter to Kharge
Ambedkar Writes Letter to Kharge

सिदार्थ मोकळे यांनी प्रतिक्रिया

मुंबई Ambedkar Writes Letter to Kharge : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीतील जागावाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अवघ्या 7 जागांवर काँग्रेसला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव मांडून खळबळ उडवून दिली आहे. आंबेडकरांच्या भूमिकेमुळं विरोधी आघाडीत फूट पडण्याचा धोका वाढला आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. वंचित बहुजन आघाडीला चार जागा सोडल्या जातील, अशी केवळ चर्चा सुरू आहे. मात्र, त्यावर अद्याप शिक्का मोर्तब झालेलं नाही.



'वंचित'चं काँग्रेसला पत्र : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आणखी एक पत्र पाठवलं आहे. या पत्राच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला सात जागांवर 'वंचित'कडून पाठिंबा देण्याचा प्रस्ताव आंबेडकरांनी काँग्रेसला दिला आहे.

काय म्हटलंय पत्रात? : 17 मार्च रोजी मुंबईतील भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगता समारंभात तुम्हाला तसंच राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला. आपण विस्तृत संभाषण करू शकलो नाही, म्हणूनच आज मी पत्राद्वारे तुम्हाला कळवत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालं असून महाविकास आघाडीनं वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी तसंच बैठकीसाठी निमंत्रित न करता बैठका घेत आहे.

राष्ट्रवादी, शिवसेनेकडून नकार : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेण्यास नकार दिला आहे. महाविकास आघाडीनं वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या असमान वागणुकीमुळं आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला असल्याचं आंबेडकर यांनी पत्रात म्हटलं आहे.


सात जागांवर पाठिंबा : वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा हा फॅसिस्ट, फुटीरतावादी, लोकशाही विरोधी भाजपा, आरएसएस सरकारला पराभूत करणं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील सात जागांवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचं आंबेडकर यांनी पत्रात म्हटलं आहे. त्यामुळं मी आपल्याला विनंती करतो की, महाविकास आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी सात मतदारसंघांची नावं आपण मला द्यावीत. तुमच्या पसंतीच्या या सात जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांना आमचा पक्ष पूर्णपणे मतदार संघात पाठिंबा राहिल,अशी ग्वाही आंबेडकरांनी पत्रात दिली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छांचाच नाही, तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी नेतृत्वाची हाक देणार आहे असंही, आंबेडकरांनी पत्रात म्हटलं आहे. त्यामुळं आंबेडकरांच्या या पत्रावर काँग्रेसकडून काय प्रतिसाद मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महाविकास आघाडीकडून अल्टीमेटम नाही : जागा वाटपांच्या फॉर्मुलाबाबत महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला कोणताही अल्टिमेटम देण्यात आलेला नाही. अशा पद्धतीच्या बातम्या या खोट्या, निराधार आहेत. कारण यासंदर्भात कोणत्याही पद्धतीचा संपर्क वंचित बहुजन आघाडीशी झालेला नाही. त्यामुळं माध्यमांनी या बातम्या ज्या सूत्रांनी दिल्या, त्यांना ऑन रेकॉर्ड बोलायला सांगावं, असं आवाहन वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केलं आहे.

हे वाचलंत का :

  1. Amit Thackeray News : निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे कुटुंबातील दुसरे सदस्य उतरणार? अमित ठाकरे यांच्या नावाची 'या' मतदारसंघाकरिता चर्चा
  2. Raj Thackeray News: राज ठाकरे एनडीएमध्ये सहभागी होणार? अमित शाह यांच्याबरोबर अर्धा तास झाली बैठक
  3. Eknath Shinde vs Tejashwi Yadav : तेजस्वी यादवांवर मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल; लीडर नाहीतर डीलर शब्दावरुन रंगल्या राजकीय चर्चा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.