ETV Bharat / state

Uddhav Thackeray : गाफील राहू नका, २० मे रोजी या सरकारचे बारा वाजवा- उद्धव ठाकरे

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 17, 2024, 3:51 PM IST

Uddhav Thackeray : लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, देशात 7 टप्प्यात आणि राज्यात 5 टप्प्यात मतदान होणार आहे. मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. केंद्र सरकारचे यावेळी बारा वाजवायला या, असं आवाहन शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलंय.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे

मुंबई Uddhav Thackeray : डोंगरी, भायखळा परिसरातील शिवसेना शाखेला उद्धव ठाकरेंनी भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांना बहुमताने विजयी करा, असं आवाहन यावेळी शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी केलं.

गाफील राहू नका : मे महिन्यात शाळांना सुट्टी असेल, मुंबईत बहुसंख्य मराठी माणसे ही कोकणी आहेत. कोकणी माणूस या काळात कोकणात जातात. आपल्या गावी जातात, मात्र २० मे रोजी केंद्रातील मोदी सरकारचे बारा वाजवायला मुंबईत परत या, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. मुंबईत २० मे ला निवडणूक आहे. गाफील राहू नका, असं सांगत त्यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. छापे टाकायचे आणि काटे काढायचे हाच उद्योग भाजपाने केला. पूर्वीचे भाई कुणी मारूती कार घेतली तर त्यांना खंडणी मागायचे. आताचे भाई कंपन्यांना फोन करून बोलावून घेतात आणि खंडण्या वसूल करतात, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली. तसेच निवडणूक रोखे निधीच्या मुद्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली. भाजपा आणि मोदी-शाह यांच्या १० वर्षांच्या सत्ताकाळाचा कार्यअहवाल प्रकाशित केल्यास किती पक्ष फोडले? किती कुटुंब फोडले? किती सरकारे पाडली? हेच यातून दिसेल, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि मोदी सरकारवर घणाघात केला.

शिंदेंची तुलना कोरोनाच्या विषाणूशी : मुंबईतील रेल्वे स्थानकांचे नामांतर करण्यासाठी पत्र लिहिणाऱ्या राहुल शेवाळे यांचा उल्लेख न करता त्यांनाही ठाकरेंनी टोला लगावला. रेल्वे स्थानकांचे नामांतर करण्यासाठी सुरुवातीला अरविंद सावंत यांनी पुढाकार घेतला होता, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आजच्या घडीला शिवसेनेतील अनेक जुने चेहरे दिसतात. स्थानिक कारणांमुळे ते पक्षापासून दूर गेले होते; मात्र आता ते गद्दारांना गाडण्यासाठी पुन्हा पक्षासोबत आल्याचं ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री असताना जाहिराती यायच्या. त्यात कोरोनाच्या विषाणूचे चित्र असायचे. आता ज्या जाहिराती येत आहेत, त्यात एक दाढीवाला विषाणू दिसतो, असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अप्रत्यक्षपणे तुलना कोरोना विषाणूशी केली. गद्दाराने शिवसेना संपवली, अशी इतिहासात या माणसाची नोंद राहील, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली.

हेही वाचा :

  1. Ed Sheeran And Diljit Dosanjh: एड शिरीननं दिलजीत दोसांझबरोबर स्टेजवर गायलं पंजाबी गाणं, चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का
  2. Indapur Crime News: जेवायला हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या, गँगवॉरची शक्यता
  3. काँग्रेस नसती तर तुमचं काय झालं असतं? चर्चा करायला कधीही तयार... सुप्रिया सुळेंचा भाजपाला टोला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.