ETV Bharat / state

पुन्हा आंबेडकर विरुद्ध गांधी आमने-सामने, वंचित भाजपाची बी टीम असल्याचा तुषार गांधींचा आरोप - Tushar Gandhi Alleges Vanchit

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 13, 2024, 3:23 PM IST

Tushar Gandhi : महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम असल्याचा आरोप केला आहे. महायुतीला मतदान करू नका. बाबासाहेबांचे संविधान वाचवण्याची ही शेवटची संधी असल्याचं मत गांधी यांनी मांडलं आहे. जाणून घ्या सविस्तर वृत्त...

Tushar Gandhi
तुषार गांधींचा आरोप

तुषार गांधी यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते

मुंबई Tushar Gandhi : भारत देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर मोहनदास करमचंद गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांचं योगदान फार मोठं आहे. डॉ. आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना लिहिली तर आपल्या अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधी यांना ब्रिटिशांना झुकण्यास भाग पाडले होते; मात्र तुम्हाला माहीत आहे का डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद असल्याने त्यांच्यातील वाद जगजाहीर होता. महाविकास आघाडी सोबत न जाता प्रकाश आंबेडकर यांच्या स्वबळाच्या भूमिकेवर तुषार गांधी यांनी कडक शब्दात टीका केली. त्यामुळे पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर आणि गांधी नव्यानं वाद सुरू झालाय. आम्ही असं का म्हणतोय समजून घेऊया.



आंबेडकर विरुद्ध गांधीवादाची आठवण : लोकसभा निवडणुकीत प्रचारात रंगत चढली आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी देशातील राष्ट्रीय पक्षांचे प्रमुख नेते महाराष्ट्रात सभा घेत आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा प्रकारची लढाई पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडी सोबत जागा वाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळाचा नारा देत 22 लोकसभा मतदारसंघात उमेदवार घोषित केले तर दोन ठिकाणी उमेदवार बदलले आहेत. अशा प्रकारे वंचितने दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. त्यामुळे महाविकास आघाडी वंचितला आपल्यासोबत घेण्यासंदर्भात आग्रही होती. तसच प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात मविआकडून सावध भूमिका घेतली गेली. मात्र महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी वंचितच्या भूमिकेवर कडक शब्दात टीका केली. त्यामुळे आंबेडकर विरुद्ध गांधी इतिहासातील वाद पुन्हा पेटल्याची आठवण राज्याला झाली आहेत.


तुषार गांधी काय म्हणाले : देशातील लोकसभा निवडणूक तिसऱ्या टप्प्यात पोहचली आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आपल्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केलं जात आहे. तर दुसरीकडे वंचित देखील सत्ताधारी आणि विरोधी पक्षा विरोधात मैदानात उतरली असून भाजपा सोबत काँग्रेसने 20 जागांवर मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांच्यासह भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाला गद्दारांची युती म्हटलं पाहिजे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाच्या महायुतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करणं महत्त्वाचं असून एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये, असं आवाहन तुषार गांधी यांनी मतदारांना केलं आहे.

वंचित भाजपाची बी टीम : तुषार गांधी यांनी वंचित भाजपाची बी टीम असल्याचा आरोप केला आहे. या लोकसभा निवडणुकीत स्वहिताचा विचार करण्यापेक्षा राष्ट्रहिताचा विचार करायला हवा होता; पण त्यांनी तो केला नाही. म्हणून ते टीकेचे धनी असल्याचंही तुषार गांधी यांनी म्हटलय. राज्यातील महायुतीला मतदान करू नका, महाविकास आघाडीला मतदान करा असं आवाहन प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्राच्या माध्यमातून तुषार गांधी करत आहेत. प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्राला अनेक सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक आणि कलावंतांचा पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महायुतीला मतदान करू नये यासाठी आपण मतदारसंघात फिरून जनजागृती करणार असल्याचं गांधी म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान वाचवायचं आहे, त्यासाठी ही शेवटची संधी असल्याचं ते बोलले.

आरोप करण्यात वेळ घालवू नका : तुषार गांधी यांनी वंचितवर केलेल्या आरोपानंतर प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं आहे. तुषार गांधी यांनी केलेलं विधान अत्यंत चुकीचं, आधार नसलेलं आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारं असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसंच अनेक प्रश्नांचा भडिमार प्रकाश आंबेडकर यांनी तुषार गांधी यांच्यावर केला आहे. महाविकास आघाडीने कशाप्रकारे वंचित सोबत व्यवहार केलाय तुम्हाला माहिती आहे काय? त्यांचे राजकारण किती अलिप्त आहे ते तुम्हाला माहिती आहे काय? महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आणि भाजपात झालेली तडजोड तुम्हाला माहिती आहे काय? अशा प्रकारचे प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी ट्विटच्या माध्यमातून तुषार गांधी यांना विचारले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलय त्याप्रमाणे जर तुमच्याकडे राजकीय ज्ञान आणि समज नसेल तर निरर्थक गोष्टी आणि निराधार आरोप करण्यात वेळ घालवू नका. सत्य परिस्थिती काळच समोर आणेल. त्यामुळे तुम्ही डोळे बंद केल्याप्रमाणे आधार नसलेलं वक्तव्य करून जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलय.



भूमिका दुरुस्त करा - सिद्धार्थ मोकळे : वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, तुषार गांधी यांचं वक्तव्य अज्ञानातून आणि चुकीच्या माहितीतून आलेलं दिसतंय. यावेळी तुषार गांधी यांना आठवण करून देताना मोकळे म्हणाले की, आपल्या पणजोबांनी ब्रिटिशांविरोधात उभारलेला लढा सर्वसमावेशक होता. भारतात असलेल्या संसदीय लोकशाहीने तेथील शोषित वंचित समूहाला त्यांचं राजकारण करण्याचा अधिकार दिला आहे. निवडणुका लढण्याचा अधिकार दिला आहे; मात्र तोच अधिकार तुषार गांधी नाकारत आहेत. प्रस्थापित पक्षांना मतदान करा, अशा प्रकारचं आवाहन ते करत आहेत. भाजपाला मतदान करू नका, महाविकास आघाडीला मतदान करा असं ते सांगताय; मात्र महाविकास आघाडीतील नेते आणि पक्ष कधी भाजपा सोबत जातील याची शाश्वती नाही.

मविआचं भाजपासोबत साटंलोटं असल्याचा आरोप : वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे पुढे म्हणाले की, काल परवा महाविकास आघाडीकडून बोलणारे नेते आणि प्रवक्ते शिंदे, शिवसेना आणि भाजपासोबत जात आहेत. यावर तुषार गांधी बोलत नाहीत. महाविकास आघाडीचं भाजपासोबत साटंलोटं करण्याचं राजकारण सुरू आहे. ते कधीही भाजपा सोबत जाऊ शकतात. तुषार गांधी यांनी शोषित वंचितांचा राजकीय हक्क नाकारणं हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यांनी आपल्या भूमिकेचा पुन्हा विचार करून ती दुरुस्त करावी अशी मागणी वंचितचे प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी केली आहे.



'वंचित' पक्षाचा पॉलिटिकल स्टंट- तुषार गांधी : वंचित आणि एमआयएम यांच्या संदर्भात तुषार गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला होता. तसंच वंचितकडून आलेल्या प्रतिक्रिया संदर्भात तुषार गांधी यांच्याशी ईटीव्हीने संपर्क साधला असता ते म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी पक्षाचा हा पॉलिटिकल स्टंट आहे. वंचितने जो पक्ष बनवला आहे त्याची जबाबदारीची आठवण आपण त्यांना करून दिली आहे. बाबासाहेबांच्या संविधानाला धोका निर्माण करणाऱ्यांना आपल्याकडून मदत होते, हे समजायला हवं होतं. यावेळी स्वतःची महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून मोठेपणा दाखवायला हवा होता; मात्र त्यांनी तसं केलं नाही. त्याकरता त्यांची निंदा करायला हवी होती, ती केली पाहिजे असंही तुषार गांधी यांनी म्हटलं आहे. आपण सत्य बोललो हे त्यांना देखील माहीत आहे, असं तुषार गांधी म्हणाले आहेत.

हेही वाचा :

  1. भाजपा हा xxखाऊंचा पक्ष! अब की बार, भाजपा तडीपार; उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका - Uddhav Thackeray
  2. यात्रा-जत्रांच्या हंगामात तमाशांची सुपारी अडकली आचारसंहितेच्या कात्रीत, वेळेच्या निर्बंधामुळे बुकींग थंडावलं - Tamasha Fad Booking
  3. 'एकनाथ शिंदे गट म्हणजे भाजपाची रखेल'; संजय राऊतांची खालच्या भाषेत टीका - Sanjay Raut
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.