ETV Bharat / state

बिहारहून होळी साजरी करुन आले अन् सलमानच्या घरावर केला गोळीबार; गोळीबार प्रकरणाची 'Inside Story' - Salman Khan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 8:15 AM IST

Salman Khan House Firing
बिहारहून होळी साजरी करुन आले अन् सलमानच्या घरावर गोळीबार केला; सलमानच्या घरावरील गोळीबाराची 'Inside Stody'

Salman Khan House Firing : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी गुजरातमधून ताब्यात घेतलंय. आता या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम समोर आलाय. तसंच "ही मुंबई आहे, इथं कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार आहे. बिश्नोई गॅंगला सुध्दा संपवून टाकू," असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय.


मुंबई Salman Khan House Firing : बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान याच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गुजरातच्या भूज (कच्छ) मधील माता नो मठ या मंदिरातून अटक केलीय. विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असून दोघंही बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय. तसंच दोघंही बिहार राज्यातील चंपारण्य येथील रहिवासी आहेत. हे दोघं आरोपी मुंबईत कधी आले आणि पुढं त्यांनी गोळीबाराचा कट कसा रचला, याबाबत माहिती समोर आलीय.

गोळाबार केल्यानंतर गुजरातला काढला पळ : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी आपर्टमेंटमधील घरावर रविवारी पहाटे 4 वाजून 50 मिनिटांनी दोघांनी गोळीबार करुन पळ काढला होता. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन गुन्हा पुढील तपासासाठी गुन्हे शाखेकडं वर्ग करण्यात आला. वांद्रे बँडस्टँडमार्गे दुचाकीवरुन आल्यानंतर सागर पाल आणि विक्की गुप्ता यांनी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दिशेनं पाच राउंड फायर करुन पळ काढला. त्यानंतर सागर पाल आणि विक्की गुप्ता यांनी येथील माउंट मेरी चर्च जवळ दुचाकी सोडून रिक्षानं पश्चिम रेल्वेचं वांद्रे रेल्वे स्थानक गाठलं. वांद्रे रेल्वे स्थानकावरुन या दोघांनी सकाळी 5 वाजून 8 मिनिटांची बोरिवलीच्या दिशेनं जाणारी लोकल पकडली. मात्र, हे दोघंजण मध्येच सांताक्रूझ रेल्वे स्थानकावर उतरले. सांताक्रुझ रेल्वे स्थानकातून सव्वापाचच्या सुमारास बाहेर पडून हे दोघं वाकोल्याच्या दिशेनं चालत गेले. येथून त्यांनी एक टॅक्सी पकडली. टॅक्सीनं मुंबईच्या वेशीपर्यंत जात तेथून बसनं गुजरातच्या सूरत, अहमदाबाद मार्गे भूजमध्ये पोहचले. येथील आशापुरा मातेच्या मंदिरात ते लपून बसले होते.

गोळीबार करण्यापूर्वी केली होती रेकी : गुन्ह्यातील तांत्रिक पुराव्यांवरुन गुन्हे शाखेनं आरोपी पाल आणि गुप्ता यांचा माग सुरुच ठेवला. दोघंही भूजमध्ये असल्याचं समोर येताच गुन्हे शाखेनं पोलीस पथक भूजला रवाना केलं. आरोपी वास्तव्यास असलेल्या परिसर माहितीचा नसल्यानं आणि आरोपींकडं पिस्तुल असण्याच्या शक्यतेतून गुन्हे शाखेनं भूज पोलिसांची मदत घेत दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. बिहार राज्यातील चंपारण्यचा रहिवासी असलेला आरोपी सागर पाल हा हरियाणामध्ये गेला असताना बिश्नोई टोळीच्या संपर्कात आला होता. पुढं त्यानं गुप्ताला टोळीत ओळख करुन दिली. आरोपी पाल आणि गुप्ता 28 फेब्रुवारीला मुंबईत आले. 28 फेब्रुवारी आणि 29 फेब्रुवारीला दोघांनी वांद्र्यात राहून सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट्समधील घराची रेकी केली. नंतर 1 मार्चला दोघंही पनवेलला गेले. सलमान खानच्या पनवेलमधील फार्म हाऊस पासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या हरिग्राम गावातील राधाकृष्ण अपार्टमेंटमधील एक फ्लॅट त्यांनी 11 महिन्यांच्या भाडेकरारावर घेतला.

होळीसाठी गेले होते गावी : नंतर पाल आणि गुप्ता हे 20 मार्चला होळी साजरी करण्यासाठी चंपारण्यमधील आपल्या गावी गेले. 28 मार्चला दोघंही पुन्हा मुंबईत परतले. त्यानंतर पाल यानं 24 हजार रुपये देऊन 2 एप्रिलला सेकंड हॅन्ड बाईक खरेदी केली. दोघांनी 14 एप्रिलच्या पहाटे सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर पाच गोळ्या झाडून पळ काढल्याचं गुन्हे शाखेच्या तपासात समोर आलंय. सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर दोन्ही आरोपींनी गुजरात गाठलं. वाटेत लागलेल्या नदीत त्यांनी पिस्तूल फेकून दिल्याची माहिती पोलिसांना दिली. याबाबत आरोपींची चौकशी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

बिश्नोई गॅंगला सुध्दा संपवून टाकू : "ही मुंबई आहे, इथं कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार आहे. बिश्नोई गॅंगला सुध्दा संपवून टाकू," असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिला. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी सलमानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली. दरम्यान, "संपूर्ण खान कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी सरकार घेईल," अशी ग्वाही दिली. तसंच मुंबई पोलिसांच्या कामगिरीचं तोंडभरुन कौतुक केलं. "गुन्हेगारीच्या मुळापर्यंत तपास करुन आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल," असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तसंच मुंबईसह महाराष्ट्रात कुठलीही गॅंग नाही. अंडरवर्ल्डही पूर्णतः संपलंय. आता बिश्नोई गॅंग सुध्दा संपवून टाकू, असा सज्जड इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. सलमान खान खूप मोठे सिने अभिनेते आहेत. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सरकार घेईल. तसंच पोलीस आयुक्तांना सलमान आणि कुटुंबाला सुरक्षा पुरविण्याचे निर्देश दिले असून अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी पोलिसांना सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात? पाचवेळा मिळालीय जीवे मारण्याची धमकी - salman khan
  2. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दोन अज्ञातांचा गोळीबार, लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीवर पोलिसांचा संशय - Salman Khan
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.