ETV Bharat / state

'गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्यसरकार', संजय राऊत यांचा महायुतीवर निशाणा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 9, 2024, 5:25 PM IST

Sanjay Raut
संजय राऊत

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. 'गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्यसरकार' अशा शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकेचे बाण सोडले आहेत.

संजय राऊत यांची पत्रकार परिषद

मुंबई Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून राजकारणातील गुंडांचा वाढता सहभाग चर्चेचा विषय बनला आहे. अनेक राजकारण्यांचे गुंडांबरोबरचे फोटो व्हायरल होत आहेत. तसंच थेट राजकीय वादातून हत्या केल्या जात आहेत. या सर्व मुद्द्यांवरून राजकारण तापलं असून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 'गुंडांसाठी गुंडांनी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्राचं राज्य' अशा शब्दात महायुती सरकारला सुनावलं आहे.

गुंड मुख्यमंत्र्यांना भेटायला : राजकारणातील गुंडांच्या वाढत्या सहभागाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, "गुंड मुख्यमंत्र्यांना भेटायला मंत्रालयात येत आहेत. गुंड, माफिया मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं बॅनर लावत आहेत. अनेक कंत्राटं गुंडांना दिली जातात. आठ हजार कोटींच्या रुग्णवाहिकेचं कंत्राट कोणाला मिळालं? त्यात किती माफियांचा हात आहे, ते लवकरच बाहेर येईल. कल्याणला गणपत गायकवाडवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्यात मुख्यमंत्र्यांसह त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांचं नावं समोर आलं आहे. त्यामुळं पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तत्काळ चौकशी करायला हवी होती. अन्य कोणी असतं, तर त्यांची चौकशी झाली असती. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते, पण महाराष्ट्रात गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोणी हिशोब मागितला नाही', अशा शब्दांत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.



फडणवीस अकार्यक्षम गृहमंत्री : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळं महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीच घडलं नाही. पुणे, अहमदनगर जिल्ह्यात हत्या झाल्या आहेत. मात्र, राज्याचे गृहमंत्री कुठे आहेत? आता ते गायब झाले आहेत. गृहमंत्री फडणवीस विदर्भात 'चाय पे चर्चा' करत आहेत. ते महाराष्ट्रात होत असलेल्या हत्यांबाबत कधी चर्चा करणार? तुम्ही अत्यंत अयशस्वी, अकार्यक्षम गृहमंत्री आहात. महाराष्ट्रात नवनवीन खून करण्याची सुपारी घ्यायला देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला गेले आहेत का?" असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

नरेंद्र मोदी, अमित शाह राज्याचे गुन्हेगार : खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. "नरेंद्र मोदींसह अमित शाह महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत. त्यांनी 'शिंदे' सरकार महाराष्ट्रावर लादलं आहे. त्यामुळं 'हे' सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी. भाजपाचे आमदार पोलिसांना धमकावत आहेत. यालाच कायद्याचं राज्य म्हणायचं का?" असा हल्लाबोल संजय राऊतांनी महायुती सरकारवर केलाय.

हे वाचलंत का :

  1. अभिषेक घोसाळकर खून प्रकरण नेमकं काय ? 'मॉरिस भाई'नं का केला थंड डोक्यानं खून आणि नंतर आत्महत्या...!
  2. उद्धव ठाकरेंनी घेतलं अभिषेक घोसाळकर यांचं शेवटचं दर्शन, दुपारी अंत्यसंस्कार
  3. कोरोना योद्धा ते कोल्ड ब्लडेड मर्डरर! जाणून घ्या कोण होता अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणारा मॉरिस नरोना?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.